Jump to content

पान:ओळख (Olakh).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कौरवांची अन्यायाची आहे. दुर्योधनाच्या बाजूने आपण राहिलो हे आयुष्यभर आपण केलेले पाप आहे. कर्णाला ही जाणीव झाल्याशिवाय त्याच्या मृत्यूला आत्मबलिदान म्हणता येणार नाही. कर्णाला ही जाणीव झाली केव्हा ? जर आपण असे मानले की युद्धाच्या सतराव्या दिवशो मत्युच्या सीमेवर असताना कर्णाला ही जाणीव झाली तर त्या अर्थाचे कर्णाचे जीवन पापमय आणि पापाचे साथीदार मानावे लागते. जे जीवन पापमय आणि पापाचे साथीदार असे आपण मानतो त्या जीवनाचे उदात्तीकरण त्याच संस्कृतीची मल्ये स्वीकारल्यानंतर करता येत नाही. कर्णाच्या जीवनाची सर्व उदात्तता आणि भव्यता त्याने दुर्योधनाची बाजू रास्त व न्याय्य समजून त्याला सहकार्य देण्यावर अवलंबून आहे. एरवी भीष्म द्रोणाचे पंक्तीत उभे राहून कर्णानेही वेळोवेळी दुर्योधनाची कानउघाडणी केली पाहिजे व केवळ मित्रकर्तव्य म्हणून, केवळ नाइलाजाने दुर्योधनाच्या बाजूने लढले पाहिजे. मग या कर्णाला दर्पोक्ती व बढाया मारता येणार नाहीत. युद्धाचा उत्साह दाखवता येणार नाही. सत्य कोणतेही असो कर्ण दुर्योधनाची बाज रास्त समजत आला. ज्या क्षणी कर्णाने दुर्योधनाची बाजू पापमय आहे हे जाणले त्याक्षणी त्याने स्वेच्छया आत्मबलिदान केले असे जर म्हणावयाचे असेल तर जन्मभर ज्याच्या मित्रत्वाचा कर्णाने अभिमान बाळगला त्या मैत्रीशी मृत्यूच्या सीमेवर कर्ण अप्रामाणिक झाला असे मत द्यावे लागते. हे मत दिल्यानंतर वेळोवेळी विरोध दाखवणारा शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्याशी प्रामाणिक राहणारा व चिरंजीव असल्यामुळे न संपणारी जखम आपल्या शरीरावर वाळगीत युगानुयुगे विव्हळणारा अश्वत्थामा कर्णाहून श्रेष्ठ ठरतो.
  महाभारत ही अशी अडचणीची कथा आहे. ती कोणाचाही मोठेपणा शिल्लक राहू न देता आपल्या गतीने वाहत असते. या कथेमधील एखाद्या पात्राचे प्रेम कुणाच्याही हितासाठी अडचणी निर्माण करणारे आहे. या अडचणी भीष्मावर प्रेम करणासाठी आहेत, कृष्ण, अर्जुन, धर्मराजावर प्रेम करणारांसाठी आहेत. कर्णावर प्रेम करणारांसाठी आहेत. पण अडचणी आहेत म्हणून प्रेमाचा प्रवाह कधी थांबत नसतो. असे प्रेम जर कुणाला कर्णाविषयी वाटले तर शेवटच्या क्षणी सूर्य पुत्राने आत्मविसर्जन केले असे म्हणण्याचा हा प्रेमापोटो उद्भवलेला हक्क मला मान्यच आहे

महाभारतातील कोण्याही एका व्यक्तीविषयी माझ्या मनात आत्यंतिक प्रेम किंवा आत्यंतिक राग नाही. याला अपवाद असेल तर फक्त भगवान कृष्णाचा आहे. कारण तो सर्व पापे करणारा पुण्यवान आहे आणि सर्वप्रकारच्या लोकव्यवहारात रस घेणारा मूलतः विरागी आहे. या भगवंताच्या लीला चोरीपासून तत्त्वज्ञानापर्यंत महाभारतात सारख्याच पसरलेल्या आहेत. महाभारताला

ओळख

५६