पान:ओळख (Olakh).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रतीपेक्षा सुद्धा २७ अध्यायांनी कमी आहे. पण वैद्यांच्या मते मूळ महाभारतात यातील किमान साठ अध्याय तरी नसतील
 संपादकांनासुद्धा जो भाग मूळ महाभारताचा म्हणून वाटत नाही तो भाग त्यांनी पाठचिकित्सा शास्त्राची मर्यादा म्हणून तूर्त मान्य केलेला आहे. पाठचिकित्सा शास्त्राची महाभारतासाठी वापरली गेलेली तत्त्वे जर आपण बारकाईने पाहिली तर असा निर्णय द्यावा लागतो की चिकित्सक आवृत्ती आपणासमोर स्थूलमानाने इ. स. १००० चे महाभारत उभे करते. आवृत्ती म्हणजे इ. स. १००० पर्यंतच्या भारतीय संस्कृतीने मान्य केलेली पण पुन्हा धर्मपरंपरामान्य अशा संस्कृतीचीच कथा आहे. तुम्हाला सतराव्या शतकापर्यंत पुढे येऊन संस्कृतीने मान्य केलेले सत्य स्वीकारावयाचे असेल, ते स्वीकारा. तुम्हाला प्रायः मुसलमानी आमदानीत हिंदूंच्या हासकाळात झालेला विस्तार अमान्य करावयाचा असेल व हिंदू संस्कृतीच्या वैभवाच्या काळात सिद्ध झालेली कथाच स्वीकारायची असेल तर ती स्वीकारा. त्यासाठी व्यासाचे मनोगत सांगण्याचा आव आणण्याची गरज नसते. हे व्यासांना म्हणायचे आहे असे सांगण्यात एक जोर असतो. तो जोर हा की, याविना ह्या निराळे जे कोणी काही सांगतील ते भगवान व्यासाचे अपराधी आहेत. हा आव भ्रामक आहे.
महाभारताच्या चिकित्सक आवतीचे समर्थन या ठिकाणी करण्याची गरज नाही. चिकित्सक आवृत्ती हाही एक मानवी प्रयत्न आहे. सर्व मानवी प्रयत्नांप्रमाणे तो सदोष असू शकतो. पण या आवृत्तीवर आक्षेप घेण्यापूर्वी या संपादकांचे ग्रह-आग्रह किंवा त्यांचे वाटणे न वाटणे हा चिकित्सक प्रत तयार करण्याचा आधार नसतो. त्याचे आधार याहून निराळे आहेत. ज्ञानाच्या क्षेत्रात एखाद्या संपादकाला वाटणे न वाटणे यावर तयार झालेली प्रत अशी मान्यवर ठरतं नसते. चिकित्सक आवृत्तीने स्वीकारलेले मुख्य आधार तीन आहेत. क्षेमेंद्राचा 'भारत मंजिरी' हा ग्रंथ ज्या कथा नोंदवतो तेवढया कथा चिकित्सक आवृत्ती स्वीकारतेच. महाभारताच्या हस्तलिखित प्रतीच्या ज्या तीन परंपरा (म्हणजे दक्षिणी, उत्तरी आणि काश्मीरी ) आहेत. या तिन्ही परंपरांना समान असणारा भाग बहुधा क्षेमेंद्रात असतोच. पण नसला तरी चिकित्सक आवृत्ती हा भाग स्वीकारते. दक्षिणी अगर उत्तरी यांपैकी एकाही प्रतपरंपरेत जर एखादा भाग सार्वत्रिक असेल तर तो चिकित्सक आवृत्ती स्वीकारते. कथाभागांच्या बाबत हा मुद्दा. प्रत्यक्ष शब्दरचनेबाबत प्राचीन प्रती आणि प्राचीन टीकाकार यांचा आधार घेण्यात येतो. कर्णपर्वातील जो भाग गाळल्याबद्दल देशमुख संपादकांना दोष देतात तो भाग याच कारणासाठी गाळण्यात आलेला आहे.

३८

ओळख