Jump to content

पान:ओळख (Olakh).pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कर्ण हा कुंती आणि सूर्याचा पुत्र या दृष्टीने उभय कुलातील श्रेष्ठत्व लाभलेला असा पुरुष म्हटला पाहिजे. विवाहाच्या आधीचे मूल ही घटना आज आपण ज्या प्रकारे समजून घेतो त्या प्रकारे इसवीसनापूर्वीच्या भारतात समजून घेतली जात नव्हती. कानीन पुत्र हा त्या काळी पुत्रांचा एकच वर्ग मानला जात असे. असे पुत्र मातेच्या विवाहानंतर तिच्या पतीचे मानले जात. अशा प्रकारे ज्यांची जन्मकथा आहे ती मंडळी आपले जन्मरहस्य त्या काळी झाकून ठेवीत नसत. सत्यवतीचा मुलगा व्यास हा असा जन्मलेला आहे. तो सर्वांनीच बीजन्यायाने वंदनीय मानलेला आहे. व्यासाचे हे जन्मरहस्य चोरून ठेवण्याजोगे आहे असेही कुणी मानले नाही. मुळात ते रहस्य नव्हतेच. ती सर्वज्ञात परिस्थिती होती. कर्णाच्या बाबतीत मात्र तो कौंतेय आहे, सूर्यपुत्र आहे हे रहस्य राहिले. तो जन्मभर सूतपुत्र आणि राधेय म्हणून ओळखला गेला. सूर्यपुत्राला सूतपुत्र म्हणून जगावे लागावे हा त्याच्यावर अन्याय आहेच. येथपासून कर्णावरील अन्यायाची परंपरा सुरू होते. परशुरामाचा शाप, ब्राह्मणाचा शाप, कर्णाच्या दानशूरतेचा फायदा घेऊन झालेले कवचकुंडलांचे हरण आणि रथाखाली उतरला असताना झालेला त्याचा वध ही सगळी दुर्दैवाची ठिकाणे आहेत. पराक्रमी, दानशूर आणि सज्जन, निष्कारण अन्याय झालेला आणि दुर्दैवी ही कर्णाविषयीची लोकांच्या मनात असलेली सर्वसामान्य प्रतिमा आहे. यामुळेच कर्णाविषयी आकर्षण वाटते. विजय देशमुखांनी या आकर्षणापोटीच कर्णाचा पुन्हा एकदा अभ्यास केला आहे. पराक्रमी सूतपुत्र म्हणून कर्णाकडे दलितांच्या संदर्भात पाहिलेले नसले तरी त्यांना कर्ण दुर्दैवी वाटतोच. त्याच्या जीवनात नियतीचा खेळ सुरू झालेला आहे असे त्यांना वाटते व या संदर्भात शेवटी कर्णाने आत्मसमर्पण केले, धर्मरक्षणार्थ आत्मबलिदान केले असा मुद्दा ते मांडू पाहतात.

 विजय देशमुखांनी या मांडणीच्या रूपाने आजवर दुर्लक्षित झालेल्या महाभारतातील दोन प्रमुख मुद्द्यांकडे लक्ष वेधलेले आहे. त्यांचे निष्कर्ष मला स्वतःला मान्य नाहीत. ते का मान्य नाहीत इकडे मी वळणारच आहे. पण निष्कर्ष मान्य नसले तरी ज्या दोन अलक्षित बाबींकडे त्यांनी लक्ष वेधले आहे त्यांचा मार्मिकपणा मान्य केलाच पाहिजे. यातील पहिली बाब म्हणजे भूमीने रथचक्र गिळल्यानंतर कर्ण खाली उतरतो व जमिनीने गिळलेले चाक उपसण्याचा प्रयत्न करू लागतो. ही घटना घडल्यानंतर स्वाभाविक अपेक्षा ही आहे की कर्णाला मिळालेल्या दोन शापांप्रमाणे जसा एक शाप खरा ठरला तसा दुसरा शापही खरा ठरावा. हा दुसरा शाप परशुरामाने दिलेला अस्त्रविद्या विसरण्याचा शाप आहे. पण हा शाप खरा ठरलेला दिसत नाही. कारण कर्णाने रथचक्र उद्धरीत असताना एकीकडे अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडले असा

३४
ओळख