Jump to content

पान:ओळख (Olakh).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुखी संसारात देवयानीचा दीर्घ काळ गेला. तिला प्रथम यदू, नंतर तुर्वसू अशी दोन मुले झाली. इकडे उपवनातील शर्मिष्ठेने एक दिवस पुढाकार घेऊन ययातीशी संधान जुळविले. शर्मिष्ठेचाच इथे पुढाकार होता. याच संबंधामुळे शर्मिष्ठेला तीन मुले झाली. नंतर एक दिवस देवयानीला सत्य कळले. ह्या क्षणापर्यंत सुख देणारी व सुखाने संसार करणारी देवयानी रागावली व तिने पित्याकडे तक्रार केली. शुक्राचार्यांनी ययातीला म्हातारेपणाचा शाप दिला. येथपर्यंत ययाती भोगलंपट नाही. तो क्षत्रिय राजांच्या सामान्य धर्माप्रमाणे वागणारा आहे. आता म्हातारपण आलेल्या ययातीचे म्हणणे असे की मी अनेक यज्ञ केले त्यामुळे माझा बहुतेक काळ व्रतस्थ राहण्यात गेला म्हणून मी भोगतृप्त नाही. मला तृप्त होण्यासाठी तारुण्य हवे. ही मागणी व्रतस्थ, धर्मनिष्ठ राजाची आहे. भोगलंपट कामुकाची नाही.

 शर्मिष्ठेचा मुलगा पुरू ह्याने ययातीला आपले तारुण्य दिले. हे तारुण्य घेऊन ययाती हा हजार वर्षे सुख भोगीत राहिला. महाभारतात ह्या सुखोपभोगाचे वर्णन आहे. देवयानी व शर्मिष्ठा ह्या दोन पत्नीसह ययातीने "धर्मअविरुद्ध सुखोपभोग घेतला. (क्षेपक भागात पत्नीच्या जोडीला अजून दोन अप्सरा आहेत). इथे महत्त्वाच्या दोन बाबींची नोंद घेणे भाग आहे. एक तर नवा वारस पुरू आहे व शर्मिष्ठा आपली राजरोस सवत आहे हे स्पष्ट असूनही देवयानीने सुखाने पतीशी संसार केला. दुसरे म्हणजे हा सुखभोग धर्माच्या अविरुद्ध असा होता. ययातीने प्रदेश रक्षण केले, चोरांचा बंदोबस्त केला, युद्धे जिंकली, प्रजानुरंजन केले, साम्राज्य निर्माण केले, दीनांवर अनुग्रह केला. अनेक यज्ञ केले, दाने दिली. पितळाने तर्पण केले. महाभारतातील हे वर्तन म्हणजे सरळ सरळ आदर्श राजाने केलेल्या विवर्ग प्रतिपत्तीचे वर्णन आहे. राजधर्म व गहस्थाश्रम सफल सार्थक करण्याचे हे वर्णन आहे. म्हणजे ह्याही काळात ययाती भोगलंपट नव्हता. एक दिवस ययातीने हे जाणले की काम कधी पूर्ण होत नसतो. त्याने पुरुला राज्याभिषेक केला. तारुण्य परत दिले. उभय पत्नीसह वानप्रस्थ स्वीकारून तो वनात गेला व तप करू लागला. इथेही देवयानीने त्याला साथच दिली आहे. ययातीने प्रखर तप करून प्रचंड पुण्य मिळविले व हा पुण्यसमृद्ध ययाती मृत्यूनंतर स्वर्गात जाऊन इंद्राच्या अर्ध्या आसनाचा अधिकारी झाला. पुढे ययातीचे स्वर्गातून पतन होते तेव्हा तो ऋषींना तत्त्वज्ञान देतो. त्या मोबदल्यात पुण्य घेतो व पुन्हा स्वर्गात येतो. अशी थोडक्यात महाभारताची कहाणी आहे. स्वर्गात कायमपणे राहणाऱ्या पुण्यवान सम्राटाची ती शुभ कथा आहे. उपभोगाला सर्वस्व समजून वासनापूर्तीत जीवनाची सार्थकता शोधणारा लंपट ययाती महाभारतात नाही.

१२
ओळख