पान:ओळख (Olakh).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



जीवनाच्या संदर्भात काही सांगायचे असते. अशा वेळी पुराणकथा आधनिक मनात साठलेल्या आधनिक आशयाच्या अभिव्यक्तीचे फक्त सोईस्कर माध्यम म्हणन असतात. खांडेकरांनी नेमके हेच केलेले आहे. महाभारतातील ययाती हा त्यांचा सोईस्कर आधार आहे. त्यांची ययाती कादंबरी म्हणजे महाभारतातील पात्रांचे आकलन नव्हे. हा ययाती निराळा आहे. नास्तिक आणि जडवादी असणान्या खांडेकरांच्या समाजवादी मनाने आपला आशय वाचकांपर्यंत नेण्यासाठी ययातीचा फक्त पात्र म्हणून वापर केलेला आहे. ह्या हेतूने लिखाण करणान्या कलावंताला सगळे कथानकच नव्याने रचावे लागणार ह्याला इलाज नसतो.
 खांडेकरांनी आपल्या कादंबरीत ययातीची कथा घेताना मळच्या कथेत काही बदल केले आहेत हा तक्रारीचा मुद्दा असू शकत नाही. पुराणकथांमध्ये आपल्या सोयीनुसार बदल करण्याची प्रथा किमान दोन हजार वर्षे रूढ आहे. भास काय कालिदास काय आपल्या गरजेनुसार पुराणकथा बदलतातच. अशा प्रकारच्या बदलाचे प्राचीन साहित्यशास्त्रात समर्थनही आहे. भारतापासून खाडिलकरांपर्यंत प्रत्येकजण ह्या प्रथेचा लाभ घेत आला. खांडेकरांनीसुद्धा मळच्या कथेत बदल केलेले आहेत. सर्वांत ठळक आणि चटकन जाणवणारा बदल म्हणजे कचाचे ययाती कथेत येणे हा आहे. महाभारतातील कथेत कच संजीवनी विद्या मिळवण्यासाठी येतो व विद्या प्राप्त होताच निधन जातो. देवाचे काम करण्यासाठी देवगुरूचा पुत्र येतो. ते काम संपताच तो निधन . जातो. ही घटनाच ययाती देवयानी भेटीपूर्वीची आहे. यानंतर कचाचे काय झाले ह्याची इतर कुणी चिता केली नाही देवयानीचे काय झाले ह्याची कचाने चिता केलेली नाही. भारतीय ययातीच्या जीवनकथेत कचाला जागा नाही. खांडेकरांनी कच पुनः आणला आहे. नव्याने येणारा कच आता मान्यवर प्रतिष्ठित ऋपी झालेला आहे. हे खरे म्हणजे खांडेकर जी ययातीची कथा सांगत आहेत तिचा अंतिम नायकच कच आहे. कचाच्या ध्येयवादाचा विजय सांगणारी कथा म्हणन भाऊसाहेब ययातीची कथा सांगत आहेत. हा एक ठळक बदल झाला. पण इतरही बदल पुष्कळच आहेत. मळच्या कथेत असे बदल करणे वाङमय परंपरेला मान्यच आहे. आपण फक्त ह्या बदलाची कारणे शोधली पाहिजेत.

 महाभारतातील कथेत असे बदल केल्याशिवाय खांडेकरांना दुसरी गतीच नव्हती. जर ययातीची कहाणी ही कचाची जय-गाथा नसेल तर, ती गाण्यात प्रथम खांडेकरांना व नंतर कुसुमाग्रजांना उल्हासच वाटला नसता. सर्वसाधारणपणे लोक समजतात त्याप्रमाणे महाभारतातील ययातीची कहाणी ही विकार,

ओळख