ययातीच्या निमित्ताने
भाऊसाहेब खांडेकरांची 'ययाती' ही कादंबरी पौराणिक आहे, ती पौराणिक ह्या अर्थाने आहे की ययातीची कथा प्रथम महाभारतात येते व नंतर अनेक पुराणांमधून येते, राजा ययाती, असुर राजा वृषपर्वा व त्याची कन्या शर्मिष्ठा, असुरगुरू शुक्राचार्य व त्यांची कन्या देवयानी ही पात्रे पौराणिक आहेत. कच- ययाती कथेचा भाग नाही. यतीला फक्त पुराणांच्या मध्ये नावच आहे. पण दुरून का होईना ही पात्रे महाभारतात आलेली आहेत. सगळी पात्रे पुराणांमधली असल्यामळे रूढ अर्थाने ययातीची कथा सांगणारी खांडेकरांची कादंबरी पौराणिक आहे असेच म्हटले पाहिजे. पण कथेकडे पाहण्याची ह्यापेक्षा एक निराळी दृष्टी असते. कथानक पाहाण्यापेक्षा कथेद्वारे जो आशय अभिव्यक्त करण्याची कलावंताची धडपड चालू असते तीही पाहिली पाहिजे. त्याचे स्वरूप समजून घेतले पाहिजे. खांडेकर हे जीवनवादी कादंबरीकार असल्यामुळे तर आशयाला अधिकच महत्त्व येते. असा ययाती समोर ठेवून आपण आशयाचा विचार करू लागलो तर वेगळ्याच निर्णयावर यावे लागते. ययाती कादंबरीचा आशय वर्तमानकालीन आहे.
ऐतिहासिक आणि पौराणिक वाङमयांमध्ये वेळोवेळी हा प्रकार घडताना दिसतो. जी कथानके लेखकांना इतिहास पुराणांमधून उपलब्ध होतात त्यांचा जसाच्या तसा स्वीकार कलावंत करतीलच अशी खात्री नसते. उपलब्ध कथानकात सहभागी असणाऱ्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचे आकलन कलावंत करतीलच ह्याची हमी नसते. ललित-लेखक वर्तमान कालात वावरत असतो. त्याना वाचकही वर्तमान काळात असतो. लेखकाला स्वतःच्या