याचे एकच उदाहरण देतो. 'शाळाभेट' हे नामदेव माळींचं पुस्तक वाचल्यानंतर ‘शित' तपासून घ्यायचे म्हणून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर सातारा रस्त्यावरील तुंग या छोट्या गावातील विठ्ठलाई नगरची शाळा पाहिली. हे नगर म्हणजे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची छोटी वस्ती. चांदोली धरण उभारताना वारणा नदीच्या दोन काठावरची दोन गावे एकाच नदीच्या दोन तीराची व समोरासमोर असली, तरी एका गावात घाटावरची संस्कृती तर दुस-या गावात कोकणची. जिल्हा परिषदेच्या या विठ्ठलाई नगर शाळेस त्याच गावचे ध्येयवादी शिक्षक लाभले. शिक्षकांनी विस्थापित कुटुंबांचं दुःख ओळखून शाळेच्या परिसराला कोकण बनवून मुलांचे मानसिक सुस्थापन केले. कृष्णात पाटोळे व संजय साळुखे हे दोन शिक्षक, वर्ग चार. दोन शिक्षक दोन दोन वर्ग सांभाळतात. म्हणून गुणवत्ता, उपक्रमशीलता यात कसलाच फरक नाही. मी गेलो त्या दिवशी शाळेस सुट्टी असताना शिक्षक व विद्यार्थी दोघेही भेटले. म्हणजे ते शाळेत होतेच. जिल्हा परिषदांच्या शाळेवर सरधोपट पद्धतीने टीका करणा-यांनी ‘शाळा भेट' पुस्तकातील शाळा पाहिल्याच पाहिजेत. परिसर विकास, साधनसमृद्धी उपक्रम, प्रयोग सायात इथल्या शिक्षकांनी ओतलेला प्राण हा अनुदानातून न येता लोकसहभागातून आला होता हे लक्षात आल्यावर तर माझ्या मनात जिल्हा परिषदांच्या शाळेविषयीचा पूर्वग्रह नक्कीच दूर झाला. सर्व शाळा अशा नाहीत हे मान्य करूनही आपण हे समजून घेतले पाहिजे की या शाळांतून एक नव्या बदलाची नांदी सुरू झाली आहे. क्रांती सीतेच्या पावलांनी येते तेव्हा ती लक्षात येत नसते. पण महाराष्ट्रभर शिक्षक भरतीतून सर्व जिल्ह्यात सर्व जिल्ह्यातील शिक्षक जाऊन पोहोचले आहेत. आजच्यासारखा दुर्गम तालुक्यातील एका वाडी शाळेत मला धुळे, नंदुरबारकडील एक पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, संगणक साक्षर शिक्षक भेटले. ते दिवसरात्र शाळेतच असतात. हे पाहून, अनुभवून जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षणाविषयीचा विश्वास दुणावला. पण तरी एक प्रश्न उरतो की जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांचे सरासरी व सार्वत्रिक चित्र काय आहे?
कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा ज्या जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जातात, त्या अन्य जिल्ह्यांच्या दृष्टीने भौतिकदृष्ट्या संपन्न नसल्या तरी सुस्थितीत आहेत. काही जीर्ण इमारतींचा जीर्णोद्धार होणे आवश्यक आहे. पटनोंदणीत आघाडीवर असलेला हा जिल्हा खेड्यापाड्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वाढत जाणारी संख्या, पालकांचा पाल्यासाठी खासगी शाळात प्रवेश घ्यायचा वाढता कल, पाचवीपासून हायस्कूलमध्ये