प्रवेश घेण्यास प्राधान्य इ. अनेक कारणांमुळे पट नोंदणीत घसरण दिसून येते. याला उपाय प्राप्त परिस्थितीत आपल्या शाळांविषयी पालक व विद्याथ्र्यांच्या मनात तेथील शैक्षणिक गुणवत्तेची हरवलेली शाश्वती पुन्हा बहाल करणे हाच आहे. आज पंचवीस वर्षांपूर्वी केवळ डी.एड. असणारे प्राथमिक शिक्षकांचे चित्र बदलले आहे. पदवीधर, पदव्युत्तर, संगणक साक्षर शिक्षकांची प्रतिवर्षी वाढत जाणारी संख्या जि. प. प्राथमिक शाळांची जमेची बाजू आहे. इथल्या शिक्षकांनी आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खासगी शाळेत शिक्षक भरतीसाठी लाखाच्या बोली लागलेल्या असताना त्यांना एक पै खर्च न करता, वशिल्याशिवाय केवळ गुणवत्तेच्या आधारे नोक-या मिळाल्या आहेत. शिक्षकांची निवड जर शासन गुणवत्तेच्या आधारे करत असेल तर गुणवत्ता वर्धनाची जबाबदारी शिक्षकांचीच राहते. शिक्षकांनी स्वतःची गुणवत्ता वाढवत ठेवली पाहिजे, तशीच विद्यार्थ्यांचीही. मी अनेक प्राथमिक शाळांच्या सहविचार सभांना आवर्जून जात असतो. तेथील शिक्षकांशी संवाद साधताना माझ्या असे लक्षात आले आहे की फारच कमी शिक्षक नोकरीनंतर आपली शैक्षणिक पात्रता वाढवतात. जोपर्यंत एखादी गोष्ट सक्तीची होत नाही, तोवर ती न करण्याच्या मानसिकतेतून शिक्षकांनी बाहेर पडले पाहिजे. डी.एड., डी.टी.एड. आपली किमान पात्रता आहे. प्राथमिक शिक्षकांनी, नेट, सेट, एम.फिल., बी. एड., एम. एड., पीएच. डी. कां नाही व्हायचं? पात्रतेच्या बाबतीत 'Sky is the limit' असा ध्यास कां नाही घ्यायचा. मी माझंच उदाहरण देतो. मी डी.आर.एस. (एज्यु.) ही बी.ए., बी.एड्. समकक्ष पदविका प्राप्त करून माध्यमिक शिक्षक झालो. शिक्षक असताना मी एम. ए., पीएच. डी. झालो. ही गोष्ट आहे सन १९७५ ची. ३५-३७ वर्षांपूर्वी हे शक्य होतं तर आज का नाही? अशी ऊर्मी प्रत्येक प्राथमिक शिक्षकात निर्माण झाली तर प्राथमिक शिक्षकाचे चरित्र व चेहरा बदलायला वेळ लागणार नाही.
मी म्हालसवडे (ता. करवीर) गावी गेलो होतो. तिथे माने म्हणून मुख्याध्यापक आहेत. सहविचार सभेत मी पाहिले की त्याचे सर्व सूत्रसंचालन चिमुरडे विद्यार्थी करत होते. तेही इंग्रजीत व मोठ्या विश्वासाने. शिक्षकांचे मार्गदर्शन होते. पण कार्यक्रमाच्या वेळी प्रॉम्प्टिंग (मागून सांगणं) नव्हते. त्या शिक्षकांचा ध्यास होता. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसाठी एल. सी. डी. प्रोजेक्टर मिळावा, लॅपटॉप मिळावा... जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाला असे स्वप्न असणे हीच उद्याची मोठी आशा आहे. अरुण नरके, अरुण डोंगळे, भारत पाटील, प्रा. संजय मंडलिक (जि. प. अध्यक्ष) यांच्यासारखे