पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शब्दप्रमाण, ‘बाबा वाक्यं प्रमाणम्।' ही इथली वृत्ती होती. जे शिकले, ज्यांनी जग पाहिले, अनुभवले, वाचले त्यांनी जे आपणासी ठावे, ते दुस-याशी सांगावे। शहाणे करून सोडावे, सकळ जन।।' या न्यायाने आपणाकडे पुरोगामित्वाचा विकास, प्रचार-प्रसार झाला. तरीपण आपण आजही अंधश्रद्धच आहोत. युरोपात प्रबोधनांनी विज्ञाननिष्ठ समाज निर्माण झाला. तिथे चर्चेस ओस पडलेली आढळतात. असे दृश्य आपल्या देवळांचे नाही. भारतीय पर्यटन तीर्थक्षेत्रकेंद्री असणे हे त्याचे ठळक उदाहरण. आपणाकडे एकाच वेळी इहवाद व दैववाद हातात हात घालून फैलावतो आहे. भारतात आज आलेल्या आर्थिक समृद्धीतून आपले भौतिक जीवन आधुनिक होते आहे; पण बुद्धी, तर्क, विचार-आचार अद्वैत, विज्ञाननिष्ठ, विवेकवाद इत्यादी कसोट्यांवर एकविसाव्या शतकातही आपला जीवनव्यवहार एकोणिसाव्या, विसाव्या शतकात रेंगाळतो आहे, याला काय म्हणावे? आपण सुशिक्षित होतो; पण शहाणे, सुजाण होतो असे दिसत नाही. नव्या वसाहतीत शाळा नसेल, पण मंदिर असणारच. शाळा, ग्रंथालये ही नवसमाज निर्मितीच्या प्रयोगशाळा असतात. आपण शाळा, महाविद्यालयांतून ज्ञानाच्या कक्षा रुंदावतो; पण आपले शिक्षण माणूस घडणीत कमी पडते. स्वच्छता, प्रामाणिकपणा, नियमपालन, कायद्याचा आदर, भ्रष्टाचार मुक्ती, आंतरजातीय, धर्मीय जीवनव्यवहार, जातनिरपेक्ष विवाह, अशा छोट्याछोट्या जीवनव्यवहारातूनही आपले विद्यमान चित्र, चरित्र, चारित्र्य बदलणे शक्य आहे. शिक्षक आज अर्थसमृद्ध आहे. (विनाअनुदान अपवाद!) त्याने स्वकेंद्री समृद्धीच्या पलीकडे जाऊन आता समाज परिवर्तन आपले इतिकर्तव्य मानायला हवे. आजचा समाज माध्यमांच्या प्रभावात वाहतो आहे. त्याला थोपवणे, बदलण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षण व शिक्षकातच आहे. आज आपले राजकियीकरण झाले आहे. त्या जागी समाजकारणाचा संस्कार केवळ शिक्षकच रुजवू शकतील. भाकरी फिरविण्याची व परतविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. घात साधली तर पीक हाती येते. देशाचेही तसेच असते.

 येशू ख्रिस्ताने सुमारे ३५०० वर्षांपूर्वी (इ.स.पूर्व १५०० मध्ये) आपल्या धर्मानुयायांना ‘देवाचे देवाला नि सिझरचे सिझरला देण्याचे शुभवर्तमान सांगितले आणि युरोप एका निद्रेतून, धर्मनिद्रेतून खडबडून जागा झाला. एपिक्युरसपासून ते बर्ड रसेलपर्यंतच्या तत्त्वज्ञान्यांनी सांगितलेला विचार तिथे रुजला. आपणाकडे महात्मा फुले, महात्मा गांधी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांनी निर्मिक, जातिअंत इत्यादी सांगितलेली

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१५०