पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिकवण आपण अंगीकारली तर आपण ख-या अर्थाने धर्मनिरपेक्ष होऊ.आजच्या भारतापुढील हे आव्हान आपण पेलायला हवे. आजचा आपला समाज संवाद व व्यवहारास जात, देव, धर्म, दैव, पंथाच्या चक्रातून काढून माणूसलक्ष्यी च विवेकवादकेंद्री बनवायला हवे.
 टर्कीसारखा छोटा देश धर्मनिरपेक्ष कसा झाला, तर त्यांनी स्वीकारलेल्या धर्मविषयक विशिष्ट दृष्टिकोनामुळे - १) धर्म ही भूतकाळातील मानवनिर्मित बाब होय. तिचा बाऊ नको. २) दैनंदिन जीवनातील घटनांकडे वस्तुनिष्ठपणे पहा नि वागा. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी चालू केलेले अंधश्रद्धा निर्मूलन गतशतकातील अस्पृश्यता निर्मूलनाइतकेच मानवाधिकार केंद्री होते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. डॉ. दाभोलकरांच्या 'तिमिरातून तेजाकडे' ग्रंथाच्या ‘अंधविश्वास उन्मूलन' या हिंदी अनुवादाच्या प्रकाशनप्रसंगी आपले उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी उत्स्फूर्तपणे म्हणाले होते की, “डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा दिवस भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या इतिहासात ‘काळा दिवस' म्हणून नोंदला जाईल. त्यात धर्मनिरपेक्षतेबद्दल जी बांधीलकीची भावना व्यक्त होत होती, ती मला अधिक महत्त्वाची वाटते. ती भावना इथली विद्यापीठे आपल्या शिक्षणातून रुजवतील तर उद्याचा भारत खचीतच वेगळा असेल. अशी व्यासंगी, धर्मनिरपेक्ष तरुण पिढी घडविण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे. विद्यापीठे अर्थ उत्पादन करणारे यंत्र-नागरिक घडवित आहेत. जगात जबाबदार नागरिक घडविण्याचे केंद्र म्हणून विद्यापीठांकडे पाहिले जाते. ते जी भूमिका बजावतात, ती आपल्या शिक्षणाने बजावावी; तरच अशा व्याख्यानांना काही अर्थ राहील.


 (सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आयोजित 'डॉ. लाभसेटवार व्याख्यानमाला' अंतर्गत दिलेले भाषण.)

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१५१