पान:इहवादी शासन.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुस्लिम देश । ६१
 


अनुचित आग्रह

 इस्लामचे मुख्य आधार म्हणजे कुराण व सुन्ना. पण त्यांवरून जीवनांतल्या सर्व प्रसंगी मार्गदर्शन होत नाही. अनेक तत्त्वें, अनेक आचार, अनेक व्यवहार विषय यांचा त्यांत समावेश नाही. यासाठी त्यांवर पुढील काळच्या धर्मपंडितांनी भाष्ये लिहिली. आता आरंभापासून अंतापर्यंत एकच भाष्य असतें, तर त्यावरील एकांतिक श्रद्धेला कांही अर्थ आला असता. पण भाष्यें अनेक आहेत. अबू हनिफा (६९९- ७६७), मलिक (७१७- ७९५), शफी (७६७- ८२०) व हनवली या चार पंडितांनी चार प्रकारांनी आपल्या बुद्धीने कुराणावर भाष्ये लिहिली. तसे करतांना त्यांनी तत्कालीन रूढी व परंपरा लक्षांत घेऊनच नवा कायदा रचला. शिवाय नंतरच्या काळांत आटोमन तुर्क सुलतान वेळोवेळी नवा प्रसंग येताच स्वतंत्र फतवे काढीत असत. इस्लामच्या कायद्यांत शरीयतमध्ये- त्यांचीहि भर पडे. (मिड् ईस्ट- वर्ल्ड सेंटर, मजिद खादुरी, जॉन् हॉपकिन्स युनिव्हर्सिटी- अमेरिका, पृष्ठे २२२-२५) अशा तऱ्हेने भिन्न शतकांत, अनेक पंडितांनी रचलेला कायदा परमेश्वरप्रणीत आहे, असा आग्रह धरणें युक्त नाही, हें कोणाच्याहि सहज ध्यानांत येईल. आधीच्या भाष्यकाराचें कांही तरी चुकलें, ते अपूर्ण आहे, योग्य नाही असें वाटल्यावरूनच पुढच्या भाष्यकाराने नवी टीका रचली हें उघड आहे. शिया व सूफी पंथांची भाष्ये आणखी निराळी. तेहि मुस्लिमच आहेत व इस्लामचे तितकेच अभिमानी आहेत. सुनी पंथांतील अनेक सिद्धान्त त्यांना प्रामादिक वाटले म्हणूनच त्यांनी स्वतंत्र मार्ग चोखाळला. शिवाय पहिली चार भाष्ये होऊन चार पंथ झाले तेव्हा कोणालाहि एक पंथ सोडून दुसऱ्यांत जाण्याची परवानगी होती. म्हणजे कोणतें खरें वा खोटे हें ठरविण्याचें स्वातंत्र्य प्रत्येकाला होतें.
 अशा स्थितीत सर्वच भाष्यकार प्रमादातीत अवतारी पुरुष होते असें मुस्लिम लोक मानीत नाहीत हेंच सिद्ध होतें. आणि कोठे तरी प्रमाद असूं शकतो, दुसऱ्यांचें बरोबर असूं शकतें, हे एकदा मान्य केल्यानंतर सर्वधर्म समानत्व फार लांब नाही. पण हा विवेक बहुसंख्य लोक करीत नाहीत. पश्चिमेंत चौदाव्या शतकांतपर्यंत हीच स्थिति होती. तेथे ल्यूथरचा प्रोटेस्टंट पंथ निघाला तेव्हा प्रथम रक्तपात झाले. ज्यूंची कत्तल ही नित्याचीच गोष्ट होती. पण तेथे हळूहळू बुद्धिवाद, विज्ञानवाद, उदयास आला, माणसें विवेकी झाली. म्हणूनच तेथे ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी अशी प्रबळ राष्ट्र निर्माण झालीं. पूर्व युरोपांत लोक अंधश्रद्ध व शब्दनिष्ठच राहिले. त्यामुळे तेथे राष्ट्रसंघटना होऊ शकल्या नाहीत. पश्चिम युरोपांतील इतिहासाची आज पश्चिम आशियांतील (मध्यपूर्वेतील) मुस्लिम देशांत पुनरावृत्ति होत आहे. जे देश विवेकाचा, इहवादाचा आश्रय करीत आहेत ते प्रबळ व संपन्न होत आहेत. ज्यांना हें जमत नाही ते मागे राहत आहेत. पण सर्व इहवादाच्या मार्गाने निघाले आहेत यांत मात्र शंका नाही.