पान:इहवादी शासन.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०२ । इहवादी शासन
 

आपण ती श्रद्धा जोपासतोंच. तशीच ही. कारण या श्रद्धांवाचून मानवी जीवन म्हणजे वैराण वाळवंट!"
 आइन्स्टाइन, ऑलिव्हर लॉज, सर जेम्स जीन हे आजचे श्रेष्ठ शास्त्रज्ञ विज्ञाननिष्ठेइतकीच धर्मभावना जीवनाला आवश्यक मानतात. मग एका निष्ठेची जोपासना शासनाने करावी आणि दुसरी मात्र वाऱ्यावर सोडून द्यावी हें म्हणणें क्षणभर तरी टिकेल काय?
 पण इहवादाच्या भ्रांत अर्थामुळेच हा सर्व गोंधळ झाला आहे. निधर्मी, धर्म- निरपेक्ष शासन म्हणजे इहवादी शासन हा अर्थ मुळांतच चूक आहे. इहवादी शासन म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ शासन ऐहिक व्यवहारावर अंध, शब्द- प्रामाण्यवादी, रूढिग्रस्त, कर्मकांडात्मक धर्माची छाया जें पडू देत नाही तें इहवादी शासन. सहिष्णुता, सर्वधर्मसमानत्व, उदारमतवाद ही तत्त्वें मानणारें दुराग्रहमुक्त असे शासन तें इहवादी शासन. भारतीय शासनाने हा अर्थ ध्यानी घेतला असता तर धर्मसुधारणेसाठी अनेक संस्था स्थापून त्यांच्यामार्फत वरील दृष्टि असलेले अनेक धर्मप्रचारक त्याने तयार केले असते व इहवादाच्या वरील तत्त्वांचा सर्वधर्मीय समाजांत प्रसार करून विशुद्ध धर्मभावनेची हिंदु मुस्लिम, ख्रिश्चन लोकांत जोपासना केली असती.
 तसें झालें असतें तर भारतावरची अनेक संकटें आज टळली असती. अस्पृश्यता नामशेष झाली असती, धर्मांतर हें राष्ट्रांतर झालें नसतें, नागालॅण्ड, मल्लापुरम् तुटून निघाले नसते, जातीय दंगलींना आळा बसला असता, विज्ञानाची शतपटींनी प्रगति झाली असती आणि लोकशाहीला अवश्य ते लोक या भूमींत निर्माण झाले असते. येथल्या माणसांतून व्यक्ति निर्माण झाल्या असत्या.
 पण भारतीय शासनाने यांतले कांहीच केलें नाही. विज्ञानपूत विशुद्ध धर्माची जोपासना तर त्याने नाहीच केली. तर उलट सत्तालोभापायीं निवडणूक निष्ठेपायीं अंध, दुराग्रही, रूढिग्रस्त शब्दप्रामाण्यवादी कर्मकांडात्मक धर्माची जोपासना मात्र केली. इहवादाला बाध आला तो त्याने भूमिपूजन, मंत्रपठन, पंडितांचा सत्कार, विशिष्ट जातींना सवलती यांनी नाही. तेव्हा इहवादविरोधी आचारांबद्दल शासनावर ज्यांना तोफा डागावयाच्या आहेत त्यांनी त्या अंध, धर्माचारांवर डागाव्या. दैवी शक्तींचा आशीर्वाद मागण्यासाठी केलेल्या पठनपूजनावर, धार्मिक उत्सव- समारंभावर डागू नयेत.
 अगदी शुद्ध तात्विक बुद्धिवादाने पाहिले तर यांत विसंगति आहे हें खरें आहे. पण इंद्रियग्राह्य शक्ति व अतींद्रिय शक्ति या दोन्हींची उपासना मानवी जीवनाच्या सफलतेसाठी अवश्य असल्यामुळे ती विसंगति अपरिहार्य आहे. अतींद्रियाचें ऐहिकावरील आक्रमण कमीत कमी मर्यादेत आणून ठेवणें एवढेच आपल्याला शक्य आहे. इहवादाची त्यापेक्षा जास्त अपेक्षा नाही.