पान:इहवादी शासन.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आचारसंहिता । २९७
 

 अनुसूचित जाति-जमाती व मागासलेले वर्ग यांना शिक्षणासाठी विशेष सवलती दिल्या जातात. अनुसूचित जातीसाठी विधानसभा परिषदांत राखीव जागा ठेवल्या आहेत. इतरहि अनेक सवलती त्यांना दिल्या जातात. धर्म, जाति, पंथ, लिंग यांवरून कसलाहि भेदभाव करावयाचा नाही, हें तर इहवादी शासनाचें मुख्य तत्त्व. असें असतांना कांही विशिष्ट जाति-जमातींना आर्थिक वा राजकीय सवलती देणें हें इहवादांत कसें बसतें ?
 प्रत्येक धर्माच्या देवस्थानें, मठ, दर्गे, मशिदी यांसारख्या कांही संस्था असतात. विवाहासंबंधी, जातीसंबंधी, जन्म-मृत्यूसंबंधी कांही रूढि असतात. यांपैकी बहुतेक रूढींना धर्माचा पाठिंबा असतो. त्या धर्माच्या आज्ञाच असतात. पण या संस्था व या रूढि यांत परिवर्तन करण्यासाठी व अनेक घातक रूढि अजीबात नष्ट करण्यासाठी भारतीय शासनाने कायदे केले आहेत व यापुढेहि तसे तें करणार आहे. निधर्मी म्हणविणाऱ्या शासनाला धर्मामध्ये असा हस्तक्षेप करतां येईल काय ?
 इहवादाचीं मूलतत्त्वें जाहीर असली तरी प्रत्यक्ष व्यवहारांत अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांचा विचार करणें अवश्य असल्यामुळे थोडक्यांत त्यांचा परामर्श घेऊ.
 धार्मिक पूजोत्सवांत सरकारी अधिकाऱ्यांनी सहभागी व्हावें की नाही, हा पहिला प्रश्न. यासंबंधांत पहिली गोष्ट आपण लक्षांत ठेवली पाहिजे की, इहवाद हा धर्माच्या विरुद्ध केव्हाहि कधीहि नव्हता व नाही. तर्क, बुद्धि, इतिहास, प्रयोग यांच्या अतीत असे जे धर्मसिद्धान्त त्यांचें समाजाच्या ऐहिक जीवनावर वर्चस्व असूं नये अशी इहवादाची भूमिका आहे. विवाह, अस्पृश्यता, विज्ञान-संशोधन, शिक्षण, आर्थिक व्यवहार इत्यादि क्षेत्रांत तसल्या सिद्धान्ताची सत्ता ही घातक ठरते म्हणून ती नष्ट केली पाहिजे व बुद्धीनेच याविषयीचे निर्णय केले पाहिजेत, अशी इहवादाची मागणी आहे. ही इहवादी भूमिका मनांत दृढ ठेवून वरील प्रश्नांचा विचार केला तर त्यांची उत्तरें सुलभ होतील.
 या दृष्टीने पाहतां सार्वजनिक व्यवहाराच्या प्रारंभीं भूमिपूजन, मंत्रपठन इत्यादि जे कार्यक्रम होतात त्यांत शासकीय अधिकाऱ्यांनी सामील होण्यांत कांही आक्षेपार्ह आहे असें वाटणार नाही; पण धरण बांधणें, जहाज समुद्रांत ढकलणें, विद्युत् प्रकल्पाचें उद्घाटन या गोष्टी कांही कोणा एका विशिष्ट धर्माच्या लोकांसाठीच केलेल्या असतात असें नाही, असा यावर कोणी आक्षेप घेतात. पण अशा प्रसंगी त्या त्या कार्यांत वा संस्थेत जे पुढाकार घेणारे लोक असतात, तेथे जे कर्मचारी, अधिकारी, नियंते असतात, त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या श्रद्धेप्रमाणे, धर्माप्रमाणे, पूजन, पठन, देवता-आवाहन करणे हाच समंजस मार्ग होय.
 त्यांत कांही अन्यधर्मीय, अल्पसंख्य असणें शक्य आहे. पण त्यांनी व्यवहार ओळखून अशा गोष्टीस मान्यता देण्याचें धोरण ठेवलें पाहिजे. दर वेळी सर्व धर्मांच्या