पान:इहवादी शासन.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९६ । इहवादी शासन
 

जीजसलाच झाला होता, हें सत्य होय. तेव्हा सर्व धर्मांतलीं वचनं एकत्र करून परमेश्वराची आराधना करणें अशक्य आहे."

अनिष्ट आराधना

 अल्पसंख्यांची आराधना करीत राहिलें, तर सर्व शिक्षणच कसें अशक्य होईल तें यावरून कळून येईल. त्यांना सर्वधर्मसमानत्व मान्य नाही, प्राचीन भारतीय परंपरेचा अभिमान मान्य नाही, इतिहासांतील सत्य मान्य नाही. थोर हिंदु पुरुषांना- 'गांधींना सुद्धा- वंदन करणें मान्य नाही. जनतेचें सार्वभौमत्व मान्य नाही, विज्ञान- दृष्टीने धर्माचा अभ्यास मान्य नाही, स्त्री-पुरुष समता मान्य नाही. सारांश, राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, इहवाद, समाजवाद, यांसाठी अवश्य अशीं जीं तत्त्वें त्यांपैकी कोणत्याहि तत्त्वाचें शिक्षण विद्यार्थ्यांना देणें त्यांना मान्य नाही.
 अशा स्थितींत वरील निष्ठांवांचून भारतीय समाज जगणार नाही, उत्कर्ष पावणार नाही हें ध्यानी घेऊन त्यासाठी अवश्य त्या सर्व विषयांचें, विचारांचें, तत्त्वांचें, कल्पनांचें विद्यार्थ्यांना शिक्षण देणें- बहुसंख्य, अल्पसंख्य यांच्या कोणत्याहि तक्रारींचा कसलाहि विचार न करतां देणें- एवढाच मार्ग उरतो. भारतीय शासन असा धैर्याचा विचार करील हें शक्य नाही. तेव्हा या बाबतींमध्ये लोकवादी, राष्ट्रनिष्ठ, इहवादी समाजधुरंधरांनी जनतेंत जागृति घडवून आणून, त्या शक्तीचा आश्रय करणे हाच एक उपाय अवलंबावा हें श्रयस्कर होय.


 शिक्षणाप्रमाणेच इहवादी आचारसंहितेतील इतर विषयांचाहि ऊहापोह करणें क्रमप्राप्त ठरतें. इहवादी देशांत शासकीय अधिकाऱ्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, राष्ट्रपति, महामंत्री, मंत्री, सचिव व इतर आयुक्त यांनी धार्मिक उत्सव समारंभांत, पूजा, मंत्रपठन इत्यादि कार्यक्रमांत शासकीय अधिकारी म्हणून सहभागी व्हावें की नाही, पुढाकार घ्यावा की नाही, या प्रश्नाची सध्या बरीच चर्चा होत आहे.
 अनेक प्रसंगीं भूमिपूजन असतें, जलकलश-पूजन असतें, वेदमंत्रांचें पठन असतें. त्या वेळीं इहवादी प्रशासकांनी, तशा संघटनेच्या नेत्यांनी कोणतें धोरण ठेवावें ? वैदिक पंडितांचा सत्कार शासनातर्फे होतो, हें इहवादी धोरणाशी सुसंगत आहे काय ? नभोवाणी शासनाधीन आहे. तीवरून भजन-कीर्तन व्हावें की नाही ? भक्तिगीतें गावी का नाही ? बुद्ध, महावीर यांच्या जयंतीच्या दिवशीं शासकीय हुकमाने खाटिकखाने बंद ठेवले जातात हें कितपत युक्त आहे ? म्हणजे एकंदरीत धार्मिक आचार, विधि, कार्यक्रम, पूजा, उत्सव, समारंभ यांत शासनाने सामील व्हावें की नाही, तें इहवादी धोरणाशी सुसंगत होईल काय, असा प्रश्न हा आहे.