पान:इहवादी शासन.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आचारसंहिता । २९५
 


चिंतातुर जंतु

 अन्यायाविरुद्ध झगडण्याचें शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावें असें ते म्हणतात. पण तसा झगडा करणाऱ्या राणा प्रतापसिंहाचा गौरव त्यांना आक्षेपार्ह वाटतो. अत्याचारी औरंगजेबाविरुद्ध दाद मागणाऱ्या राजकुमारीचा गौरव करणें त्यांना मंजूर नाही. औरंगजेबाने हिंदूंचा, शिया व सूफी पंथीय मुस्लिमांचाहि छळ केला हा सत्य इतिहास शिकवूं नये असें त्यांचें अधिकृत मत आहे. 'सेक्युलॅरिझम इन इंडिया' या पुस्तकाचे संपादक व्ही. के. सिन्हा आणि त्याच पुस्तकांत एक लेख लिहिणारे प्रा. एस्. पी. अय्यर (मुंबई विद्यापीठ) यांनी आपल्या लेखांत अशींच उदात्त तत्त्वें सांगितलीं आहेत. आणि परवाच या पंडितद्वयाने 'टाइम्स ऑफ इंडिया' (दि. ४– १– ७१) मध्ये पत्र लिहून महाराष्ट्र सरकारच्या शालेय पुस्तकांत शिवाजीला 'स्वराज्य संस्थापक' म्हटल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. त्यामुळे अहमदनगरचा निजामशहा व विजापुरचा आदिलशहा हे 'परकी' ठरतात, याची या चिंतातुर जंतूंना काळजी वाटते.
 विजयनगरसारखीं राज्यें, हिंदु राज्ये म्हणूनच तीं नष्ट करावीं, हिंदु धर्माचा नाश करून इस्लामचा प्रसार करावा, हिंदु मंदिरें, मठ, स्त्रिया यांची विटंबना करावी हें बहामनी राज्याचें व त्याच्या सर्व शाखांचें कायमचें धोरण होतें. हा सत्य इतिहास शालेय विद्यार्थ्यांपासून लपवून ठेवून बहामनी सत्तेला स्वकीय ठरवावें व तें राज्य स्वराज्यच होतें, असें मुलांना शिकवावें, असा या 'सेक्युलर' पंडितांचा अभिप्राय दिसतो.
 निधर्मी शासनाने आखलेलें शैक्षणिक धोरण आणि सेक्युलर पंडितांची हीं मतें पाहिली म्हणजे एक गोष्ट निश्चित ध्यानांत येते की, सर्व धर्मीयांच्या तक्रारी ऐकावयाचें ठरविलें, तर भारतांत शाळांमध्ये धर्माचेंच नव्हे, तर इतिहास, चरित्र, साहित्य इत्यादि विषयांचेंहि शिक्षण देतां येणार नाही. भारतीय शासनाने राधाकृष्ण समिति, श्रीप्रकाश समिति अशा समित्या नेमून त्यांचे अहवाल मागविले. डॉ. संपूर्णानंद, राजगोपालाचारी, डॉ. मथाई, न्या. एस्. आर. दास यांसारख्या श्रेष्ठांनी आपलीं मतें मांडली. पण त्यांतून सर्वमान्य असें कांहीहि निष्पन्न झालें नाही. कारण सर्वधर्म- समानत्व हा जो इहवादी शासनाचा आत्मा तोच मुस्लिम, ख्रिश्चन यांना अमान्य आहे. राधाकृष्ण समिति म्हणाली, धर्मशिक्षण द्यावें, पण कोणताहि अंध सिद्धान्त (डॉग्मा) शिकवूं नये. पण सर्वधर्मसमानत्व, त्यांचें तत्त्वैक्य हाच मुळी खिश्चन व मुस्लिम यांच्या मतें अंध सिद्धान्त आहे.
 मूलोद्योग शिक्षणामध्ये सामुदायिक प्रार्थना सांगितली आहे. त्या प्रार्थनेंत सर्व धर्मांच्या प्रेषितांचे उतारे समाविष्ट केले आहेत. पण साऊथ इंडियन सिनॉड चर्चच्या समितीने यावर आक्षेप घेऊन सांगितलें की, "खरा साक्षात्कार फक्त