पान:इहवादी शासन.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९२ । इहवादी शासन
 

 इतिहास व चरित्रे सोडून साहित्याकडे वळलो तरी तीच समस्या पुढे उभी राहते. मराठी पाठ्यपुस्तकांत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास यांचे उतारे घ्यावे की नाही ? त्यांत हिंदु धर्माचा गौरव येणार. तो अल्पसंख्याकांना कसा शिकवावयाचा ? मुस्लिम आक्रमकांची निंदा येणार. हें तर अब्रह्मण्य हरिभाऊंच्या ऐतिहासिक कादंबऱ्या 'उषःकाल' 'गड आला पण सिंह गेला' ही पुस्तकें महाराष्ट्रांतील शाळांत नेमावयाची की नाही ?

भावना दुखवूं नका

 'सेक्युलॅरिझम् इन् इंडिया' (संपादक व्ही. के. सिन्हा) या पुस्तकांत प्रा. एस्. पी. अय्यर यांनी 'सेक्युलॅरिझम् व स्कूल टेक्स्ट बुक्स' असा एक लेख लिहून वरील समस्येवर तोड सांगितली आहे. ते म्हणतात, "इतिहासांत सत्य लपवावें असें मी म्हणत नाही. पण शिवाजी, कृष्णदेवराय यांना बेप्रमाण महत्त्व दिले जाण्याचा धोका आहे तो टाळावा. सत्य सुद्धा संभाळून लिहावें. वेडा महंमूद असें म्हणूं नये. कारण मुस्लिम विद्यार्थ्यांची हळवीं मनें दुखावतील. एखाद्या वेळीं मुस्लिमांनी केलेल्या अत्याचारांचें वर्णन केलें की, लगेच हिंदूंनी केलेल्या अत्याचारांचेंहि वर्णन करावें !"
 असा उपदेश करून, "अमुक एका धर्माचीं किंवा पंथाचीं मनें दुखावतील म्हणून अप्रिय गोष्टी टाळाव्यात, असें मात्र मी म्हणत नाही, इतिहासाला प्रचारपत्राचें रूप कधीहि येतां कामा नये" असें त्यांनी लिहिलेच आहे. पण वर निर्देशिलेल्या समितीने व प्रा. अय्यर यांनी जीं उदाहरणें दिलीं आहेत त्यांवरून इतिहास म्हणजे प्रचारपुस्तकेंच झाली पाहिजेत हा त्यांचा आशय स्पष्ट होतो. आणि काँग्रेस सरकारचें तेंच धोरण आहे. काँग्रेसने डॉ. ताराचंदांकडून लिहवून घेतलेला इतिहास म्हणजे काँग्रेसचें प्रचारपत्र झालें आहे, असा अभिप्राय डॉ. आर. सी. मुजुमदार यांसारख्या इतिहास- पंडिताने दिला आहे.
 नागरिकशास्त्र हें विद्यार्थ्यांना शिकवावें की नाही ? त्यांत लोकशाहीचा विचार येणार. लोकशाहींत लोक हे सार्वभौम मानले जातात. आणि हे इस्लामला मुळीच मान्य नाही. कुराण- सत्ताच सर्वत्र चालली पाहिजे, हा मुस्लिमांचा आग्रह असतो. जनतेची सार्वभौम सत्ता त्यांना अमान्य आहे, हें मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांचें मागे विवेचन केलें तेथे सांगितलेच आहे. तेव्हा लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचें शिक्षण द्यावें की नाही, असा प्रश्न उद्भवतोच. शिवाय नागरिकशास्त्रांत विवाह, कुटुंबसंस्था, स्त्रीशिक्षण, स्त्री-पुरुष समता, जातीय उच्चनीचता है विषय येतात. या विषयांतले कोणतेहि पुरोगामी विचार मुस्लिमांना मान्य नाहीत. त्यांचा पर्सनल लॉशीं, शरीयतशी संबंध येतो. आणि शरीयतला हात लावणारांना आमच्या प्रेतांवरूनच जावें लागेल, अशी अल्पसंख्यांची घोषणा आहे. अर्थातच कोणतेंहि धर्म- परिवर्तन मुस्लिमांना मान्य होणें शक्य नाही.