पान:इहवादी शासन.pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आचारसंहिता । २९१
 

 शाळेत जीं पाठ्यपुस्तकें नेमली जातात त्यांत अल्पसंख्याकांच्या भावना दुखवतील असे धडे घातले जातात अशी मुस्लिमांची तक्रार वारंवार येते. तेव्हा यासंबंधी तपास करून अभिप्राय देण्यासाठी १९६६ साली दिल्ली सरकारने प्रा. सय्यद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिति नेमली. तिने मुस्लिमांची तक्रार खरी असल्याचें सांगून आक्षेपार्ह म्हणून पुढील उतारे उदाहरणें म्हणून दिले आहेत. "मोगल सम्राट् अकबर सर्व राष्ट्र पराधीन करण्याचा प्रयत्न करीत आहे, हें पाहून महाराणा प्रताप याने प्रतिज्ञा केली की, जोंपर्यंत देश आक्रमकांच्या ताब्यांतून मुक्त होत नाही तोपर्यंत मी जंगलांत राहीन. सोन्या-चांदीच्या ताटांत जेवणार नाही व कोणताहि डामडौल करणार नाही." (हिंदी पुस्तक, भाग ४ था). हा उतारा मुस्लिमांना व सय्यद्दीन समितीला निषिद्ध वाटतो.

इतिहासाला फाटा

 याचा अर्थ असा की, हिंदूंनी मुसलमानी आक्रमणापासून भारत मुक्त करण्याचे जे प्रयत्न केले त्याची कसलीहि माहिती शालेय पुस्तकांत येतां कामा नये. रूपनगरच्या राजकन्येला औरंगजेब सक्तीने आपल्या जनानखान्यांत नेणार होता. या संकटांतून मला सोडवा अशी विनवणी राजकुमारीने एका पत्राने महाराणा राजसिंह याला केली. (नवप्रभात, भाग तिसरा). या पत्रांतील उतारा समितीला आक्षेपार्ह वाटतो. एक हिंदु राजकन्या बादशहाच्या जनानखान्यांत जाण्यास नकार देते हा इतिहास शिकविल्याने मुस्लिमांच्या भावना दुखविल्या जातात. बल्बन, कुतुबुद्दीन, अल्तमश, गझनीचा महंमद यांनी हजारो मंदिरें पाडलीं, क्रूर कत्तली केल्या, हीं वर्णनं इतिहासांत सांगणें सय्यद्दीन समितीला अनुचित वाटतें.
 इतिहासांतील व्यक्तींच्या कृत्यांचें वर्णन करतांना पाठ-लेखक त्या कृतीमागल्या हेतूंचें वर्णन करतात; या कृतींमागे कांही निष्ठा असतात, तत्त्वज्ञान असतें तें विशद करतात. समितीचा यावर आक्षेप आहे. हिंदु धर्माचा नायनाट करावा असा मुस्लिम सुलतानांचा हेतु होता व धर्मरक्षणार्थं स्वराज्य स्थापना करावी असा हिंदु वीर पुरुषांचा हेतु होता, असें कांही लिहू नये, वाटेल तें करून तें टाळलें पाहिजे असें या समितीचें मत आहे. म्हणजे जडयंत्रांच्या कृतींची वर्णनें करतात तशीं ऐतिहासिक घटनांचीं करावीं, असें त्या समितीला वाटतें. माणसांचा इतिहास न लिहितां ठोकळ्यांचा लिहावा असा याचा अर्थ होतो. भावनात्मक ऐक्यासाठी तें अवश्य आहे !
 जें इतिहासाविषयी तेंच चरित्रांविषयी होणार हे उघडच आहे. शिवछत्रपति, टिळक, महात्माजी, विवेकानंद, दयानंद यांचीं चरितें पाठ्यपुस्तकांत आली, तर अल्पसंख्याकांच्या भावना दुखविल्या जाणार. मुस्लिमेतर पुरुषांना वंद्य मानणें हैं इस्लामला निषिद्ध आहे. तेव्हा या पुरुषांची चरित्रे आलींच, तर तीं विकृत करून दिली तरच मुस्लिम संतुष्ट होतील.