पान:इहवादी शासन.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ख्रिश्चन समाज । २६९
 

मनु पालटत आहे. भारतीय ख्रिश्चनांत स्वत्व-जागृति होत आहे. आपल्याला मिशनरी व त्यांच्या वर्गाचे अधिकारी गुलामासारखे वागवीत असून, आपल्या कल्याणाची त्यांना कसलीहि चिंता नाही हें त्यांच्या ध्यानांत येत आहे.

बदललेला मनु

 सध्या ख्रिस्ती चर्चचे अधिकारी आपल्या ताब्यांतील जमिनी दीन-दलितांच्या साठी दान म्हणून देऊन टाकण्याच्या घोषणा करीत आहेत. या प्रसंगाने परकी मिशनरी व त्यांचे हस्तक यांचे काळें अंतरंग उघड झालें आहे. या घोषणा फसव्या आहेत व त्यामागे कपटकारस्थान आहे हें पुण्याच्या सकाळ पत्राने प्रथम लोकांच्या निदर्शनास आणलें. (दि. २–११–७० ). 'सकाळ'चा 'ख्रिस्ती समाजाचें दुःख' हा अग्रलेख प्रसिद्ध होतांच संपादकांना अनेक ख्रिस्ती लोकांचीं पत्रे आलीं. आपण आमच्या दुःखाला वाचा फोडली, म्हणून अनेकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. त्यांतील भायखळ्याच्या ह्यूम मेमोरियल कॉंग्रिगेशनल चर्चचे पॅस्टर रे. डॉ. के. एल्. शिंदे यांचें पत्र देऊन हें विवेचन पुरें करूं. येथपर्यंत ख्रिश्चन समाजाविषयी वर जें विवेचन केलें आहे तें सर्व सारार्थाने त्या पत्रांत आलें आहे. रे. शिंदे म्हणतात, "आमचे पूर्वज व आम्ही, आमचे सगेसोयरे सोडून, मिशनऱ्यांचे बाजारबुणगे (कँप फॉलोअर्स) झालो. आम्हांला हाताशीं धरून त्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. मिशनऱ्यांनी जनसेवा केली, उपासना-मंदिरें व इतर इमारती बांधल्या त्या सर्वांत आमचा वांटा आहे. आमच्यावांचून हे मिशनरी येथे टिकले नसते. त्यांनी हिंदी ख्रिस्ती समाजाची खोटी समजूत करून दिली की, त्यांच्यावांचून आम्ही आमच्या देशांत जगलोंच नसतों. जसे कांही आम्ही हिंदवासी नाहीच. येथे आलेल्या मिशनऱ्यांचा हेतु धर्मप्रचार व सेवा हा नव्हता हे खास. आज ते आम्हांला सहकारी न समजतां नोकर, गुलाम समजतात. पण यांचा मालकीहक्क मुळीच नाही.


 आता भारतनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ अशा ख्रिश्चन समाजाचा विचार करावयाचा आहे. सुदैव असें की, हा वर्ग बराच मोठा आहे. त्यांत प्रोटेस्टंट, रोमन कॅथॉलिक, सिरियन अशा सर्व पंथांचे लोक आहेत. भारताच्या स्वातंत्र्याची त्यांना आस होतीच. पण तितकीच पोप आणि इंग्लिश चर्च यांच्या जुलमी सत्तेपासून मुक्त होण्याचीहि इच्छा होती. स्वातंत्र्यपूर्व काळांत या वर्गाची मोठी दयनीय स्थिति होती. राष्ट्रीय चळवळीत सामील व्हावें असें त्यांना वाटे. पण चर्चचे सत्ताधारी व मिशनरी त्यांना बहिष्काराची धमकी देऊन स्वातंत्र्यलढ्यापासून परावृत्त करीत. शिवाय ब्रिटिश सरकारची भीति होतीच. तें सरकार संपूर्णतया चर्चच्या मागे उभे असल्यामुळे या राष्ट्रीय ख्रिश्चनांची दुहेरी कुचंबणा झाली होती.