पान:इहवादी शासन.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ख्रिश्चन समाज । २६५
 

 महात्माजींनी 'हरिजन' मधील (दि. १९- १२- ३६) आपल्या लेखांत हाच अभिप्राय दिला आहे- "नाममात्र झालेल्या धर्मांतरामुळे अस्पृश्यतेचा कलंक नष्ट झाल्याचें मला दिसून आलें नाही. व्यक्तिशः कांही लोकांचा कलंक गेला असेल. मी एकंदर धर्मांतरित समाजाबद्दल बोलत आहे." कर्मवीर महर्षि वि. रा. शिंदे यांनी हीच टीका केली आहे. ते म्हणतात, "ख्रिस्ती झाल्यामुळे अस्पृश्य समाजाची कोणतीच उन्नति झालेली नाही. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सर्व जातिभेद, अस्पृश्यता या बाटलेल्या लोकांत कायम ठेविली आहे. अस्पृश्यांना चर्चमध्ये प्रवेश मिळत नाही आणि इतर जातींना चर्चमध्ये मागील बाकांवर बसावें लागतें." (माझ्या आठवणी व अनुभव, पृष्ठे २१३, ३०२). यावरून धर्मातरितांच्या मानवत्वाची प्रतिष्ठा वाढवावी असा मिशनऱ्यांच्या अनुयायी ख्रिश्चनांचा प्रयत्नहि दिसत नाही. इहवादाच्या दृष्टीने पाहतां या ख्रिश्चन समाजांत प्रगति शून्य आहे, असें यावरून दिसतें.

माणुसकीची हत्या

 केरळ-कन्यकांचा ख्रिश्चनांनी जो विक्रय चालविला आहे आणि त्याचें येथील पाद्रयांनी जें भयंकर समर्थन केलें, त्यावरून मानवी प्रतिष्ठेचीच नव्हे, तर माणुसकीचीच हत्या करण्याची धर्मन्यायासनांची (इन्क्विझिशन) व जेसुइटांची घोर परंपराच हा समाज पुढे चालवीत आहे असें दिसून येतें. मसुराश्रमपत्रिका (गोरेगाव, मुंबई) या पत्राने 'न्यू लीडर', 'गोअन स्पोर्टस वीकली', 'सिने टाईम्स', 'नवहिंद टाइम्स' इत्यादि कॅथॉलिक वृत्तपत्रांतून आलेली माहिती व मतें एकत्र करून या सर्व प्रकरणाची साद्यंत हकीकत दिली आहे. (मसुराश्रमपत्रिका, सप्टेंबर १९७०). तींतून भारतीय ख्रिश्चन समाजांतील दैवी आणि आसुरी दोन्ही वृत्तींवर चांगला प्रकाश पडतो.
 १९६४ मध्ये केरळमधून सुमारे २४० ख्रिश्चन मुली विमानाने पश्चिम जर्मनींत पाठविण्यांत आल्या. या प्रकरणाचा गवगवा होऊन शोध सुरू झाला तेव्हा एकंदर दोन हजार मुली नेण्यांत आल्या आहेत, असें उघडकीस आलें. या सर्व गरीब ख्रिश्चन घरांतील मुली होत्या. त्यांपैकी फार थोड्या मुलींना इंग्रजी येत होतें. रुग्णासेवेसाठी आपल्याला नेत आहेत, असा त्यांचा समज करून दिला होता. जर्मनींत गेल्यावर त्यांना संडास, मोऱ्या धुणे, झाडू मारणें अशीं कामें देण्यांत आली. कांही मुली रडूं लागल्या तेव्हा त्यांना कठोरपणें समज देण्यांत आली. जर्मन भाषा त्या मुलींना येत नसल्यामुळे त्यांची अवस्था फार बिकट झाली. त्यांना तेथे दोन वर्षे कैद्यांसारखें वागविण्यांत आलें. कोणाला भेटण्याची, कोणाशीं बोलण्याची परवानगी नाही, एकमेकींतसुद्धा त्यांच्या मल्याळम् भाषेत बोलावयास बंदी आणि एकंदर वागणूक निर्दय व क्रूर.
 केरळ-कन्यकांना फसवून त्यांचा असा विक्रय करण्याच्या धंद्यांत सुमारें सहा- सात सिरियनराइट पाद्री गुंतलेले आहेत. प्रत्येक पाद्रयाला प्रत्येक मुलीमागे ठराविक