पान:इहवादी शासन.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६४ । इहवादी शासन
 

आठहि पाद्रयांना तुरुंगांत पाठविलें. (मसुराश्रम- विश्वकल्याणमाला, पुष्प क्र. १४, पृष्ठे २०-२१).
 मध्यप्रदेशांतील सरगुजा संस्थानांत स्वातंत्र्यापूर्वी एकहि ख्रिश्चन नव्हता. स्वातंत्र्य येतांच संस्थानिकांनी मिशनऱ्यांवर घातलेली बंदी निधर्मी काँग्रेस सरकारने उठविली. त्यामुळे १९६१ पर्यंत तेथे नऊ हजार लोकांना बाटविण्यांत आलें. तेव्हा तेथले माजी राजे श्री. भानुप्रसादसिंह यांनी मध्यप्रदेशचे मुख्य मंत्री कैलासनाथ काटजू यांना इशारा दिला की, "या प्रकारामुळे देशाचे स्वातंत्र्य धोक्यांत आल्याविना राहणार नाही."

'मलमाड' ची मागणी

 केरळमध्ये 'मलमाड' हा स्वतंत्र ख्रिश्चन जिल्हा करावा अशी तेथील ख्रिश्चन समाजाची मागणी सध्या चालू आहे. नंबुद्रिपाद सरकारने मुस्लिमांना मल्लापुरम् दिला. त्यामागोमाग ही मागणी आली. पुढच्या निवडणुकीपर्यंत ती मान्यहि होण्याचा संभव आहे. युकॅरिस्ट काँग्रेसच्या वेळी जर्मन मिशनरी प्लॅटनर म्हणालाच होता, "केरळ हें इंडियन चर्चचें आशास्थान आहे. मध्य मलबार ही निश्चितच ख्रिस्ती भूमि आहे."
 मिशनऱ्यांना व त्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या ख्रिश्चन समाजाला भारताचीं शकलें करावयाचीं आहेत. येथल्या भारतीय समाजाच्या उत्कर्षापर्षाची त्यांना कसलीहि चिंता नाही, हें आणखी एका गोष्टीवरून दिसून येतें. वर्णभेद, जातिभेद व अस्पृश्यता हे हिंदु समाजाच्या मार्गांत येणारे त्रिदोष आहेत. ख्रिस्ती झालेल्या हिंदूंमधले हे दोष नष्ट करावयाचे व सर्वांना समपातळीवर आणावयाचें, एवढें जरी कार्य ख्रिश्चन पाद्रयांनी केलें असतें, तरी बाटलेल्या लोकांना त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, असें म्हणतां आलें असतें. व्यक्तिशः तशीं कांहीं उदाहरणें घडलींहि आहेत. पण बहुसंख्य वाटलेल्या हिंदु ख्रिश्चनांत वरील त्रिदोष तसेच राहिलेले दिसुन येतात.
 अठराव्या शतकाच्या प्रारंभी गोवेकर ख्रिस्त्यांतील दोन पाद्रयांनी दोन पुस्तकें प्रसिद्ध केलीं. त्यांतील एक ब्राह्मण ख्रिस्ती व एक चारडी (क्षत्रिय ख्रिस्ती) होता. दोघांनीहि आपापल्या जातीचें श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी हीं पुस्तकें लिहिलीं आहेत. पाद्री फारीय यांनी पॅरिसमध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या पुस्तकावर आपण ब्राह्मण असल्याचें अभिमानाने लिहिलें आहे. पाद्री पाइश याने आपण चारडी असल्याचें कंठरवाने सांगितलें आहे. डॉ. पिसुर्लेकर यांनी 'गोवेकर कॅथॉलिकांतील जातिभेद' या आपल्या लेखांत ही माहिती देऊन म्हटले आहे की, हिंदूंमधील जातीबाबत मत्सर हा दोष नवख्रिस्त्यांमध्ये बाप्तिस्म्याच्या पाण्याने नष्ट झाला नाही. (मांडवी, फेब्रुवारी १९६७).