पान:इहवादी शासन.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६२ । इहवादी शासन
 



 भारतांतील ख्रिश्चन समाज ही इहवादविरोधी शक्ति आहे काय, याचा विचार आपण करीत आहोत. त्यांतील मिशनऱ्यांचा विचार गेल्या लेखांत केला. आता उर्वरित ख्रिश्चन समाजाचा विचार करावयाचा. या समाजांत इंडियन नॅशनल चर्चचे अनुयायी असा एक वर्ग आहे. त्याचा निर्देश प्रारंभ केलाच आहे. हा वर्ग सोडून राहिलेला ख्रिश्चनांचा एक मोठा वर्ग आहे. त्याचें स्वरूप आता पाहवयाचें आहे. या वर्गाबद्दलहि सरसकट कांही विधाने करणें हें युक्त होणार नाही.
 हा समाज परदेशी ख्रिश्चन मिशनरी व त्यांच्या वर्चस्वाखाली असलेले ख्रिस्ती धर्मगुरु यांचा अनुयायी असला, धर्मक्षेत्रांत त्यांची सत्ता त्याच्यावर चालत असली, तरी त्या समाजांतहि या मिशनऱ्यांची व धर्मगुरूंची जी अरेरावी चालते तिला विटलेला असा एक वर्ग आहे, असें दिसतें. हे पाद्री लोक ऐषआरामांत लोळत असलेले तो पाहतो. त्यांचें ब्रह्मचर्य हें केवळ ढोंग आहे हें त्याला दिसत असतें. जाहीरपणें वृत्तपत्रांत पत्रे लिहून अनेक ख्रिस्ती लोक आपला हा उबग व्यक्त करतात. सध्या चर्चचे अधिकारी भूदानाची भाषा बोलत आहेत. त्यासंबंधी जी पत्रे प्रसिद्ध होत आहेत त्यांवरून हैं स्पष्ट दिसतें.
 तेव्हा इंडियन नॅशनल चर्चच्या अनुयायांखेरीजहि ख्रिश्चन समाजांत भारतनिष्ठ असा एक वर्ग आहे असें दिसतें. पण ख्रिश्चन समाजांतील हे दोन्ही वगळूनहि बराच मोठा वर्ग शिल्लक राहतो. तो अराष्ट्रीय आहे, इहवादविरोधी आहे, मिशनऱ्यांचा दास आहे. त्याच्या मनोवृत्तीचें परीक्षण आता करावयाचें आहे.
 नागालँड, झालखंड या प्रदेशांत दिसून येणारी विभक्तवृत्ति हें या समाजाचें लक्षण आहे. नागालँड हा भारताच्या ईशान्य सरहद्दीवरचा प्रदेश. त्याचें क्षेत्रफळ सव्वासहा हजार चौरस मैल असून, त्याची वस्ती पांच लाखांच्या आसपास आहे. इतकी थोडी लोकसंख्या असूनहि येथील ख्रिस्ती समाजाने स्वतंत्र प्रदेशाची मागणी केली व भारत सरकारने ती पुरवली! नागाप्रदेशांत एकंदर तेरा नागा जमाती असून, त्यांतील अंगामी, सिमा, लाथो व आओ या बाटून ख्रिश्चन झालेल्या आहेत. राहिलेल्या झेलियांग, फोम इत्यादि नऊ जमाती अजून हिंदु आहेत व त्यांची संख्या तीन लक्षांच्या आसपास आहे. म्हणजे अजून तेथे हिंदु बहुसंख्या आहे. तरीहि अल्पसंख्य ख्रिश्चनांचेंच तेथे वर्चस्व आहे. कारण शिक्षण, धन या दृष्टीने हा समाज पुढारलेला आहे व परकी मिशनरी शक्ति त्याच्यामागे उभी आहे. तेथील शासनांत एकहि हिंदु नाही. एकहि हिंदु लोकसभेचा सभासद नाही व तेथील हिंदूंवर सध्या घोर अन्याय होत आहे. पण हिंदु समाज व मिशनऱ्यांपुढे लाचार असलेलें भारत सरकार याविषयी पूर्ण उदासीन आहे.