पान:इहवादी शासन.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ख्रिश्चन समाज । २५७
 

 स्टॅन्ले जोन्स यांनी 'महात्मा गांधी- ॲन इंटरप्रिटेशन' या आपल्या पुस्तकांत हेच विचार मांडले आहेत. ते म्हणतात "आम्ही ख्रिश्चन लोकांनी आतापर्यंत इतर धर्मांकडे दोषैकदृष्टीनेच पाहिलें. आम्हांला वाटे की, त्या धर्मांत कांही चांगलें आहे असें मान्य केलें, तर मग बायबलचा प्रचार कशाला करावयाचा? पण गॉस्पेलची- बायबलची- ही दृष्टि नाही. आणि महात्माजींनीच आम्हांला बायबलमधलें मूळ सत्य समजावून दिलें आहे. त्यामुळे आमच्या वृत्तींत आता पालट झाला आहे."

म. गांधींचे मत

 पण ख्रिश्चन मिशनरी व ख्रिश्चन समाजाचे इतर नेते यांच्या आचार- विचारांवरून तसा कांही पालट झाल्याचें मुळीच दिसत नाही. ते सर्व- कांही अपवाद वजा जाता- पहिल्याप्रमाणेच असहिष्णु, हट्टाग्रही व दोषैकदृष्टि आहेत हें युकॅरिस्ट काँग्रेसच्या वेळीं व अन्य शेकडो प्रसंगीं पुनः पुन्हा दिसून आलें आहे. या त्यांच्या उद्धट वृत्तीमुळेच हिंदुधर्म, हिंदु संस्कृति व हिंदु आचारविचार यांची निंदानालस्ती करण्याचें आपलें व्रत त्यांनी पूर्वीप्रमाणेच चालविलें आहे. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या या हिदु धर्मद्वेषाचें रूप महात्माजींनी पूर्णपणें जाणलें होतें. त्यामुळेच अतिशय संतापून ते एकदा म्हणाले होते की, "हिंदु धर्माचा समूळ उच्छेद करणें हाच मिशनऱ्यांच्या सर्व प्रयत्नांचा उद्देश असतो. माझ्या हाती सत्ता असती, तर सर्व धर्मांतर मी कायद्याने बंद केलें असतें. अज्ञानी जनतेला असें फसविणें याचा मला तिटकारा आहे."
 कन्याकुमारीजवळील स्वामी विवेकानंदांच्या जुन्या स्मारकाची मिशनऱ्यांनी विटंबना केली होती. बोरिवलीजवळ मंडपेश्वर येथील जुन्या गुंफांतील मूर्तीचा विध्वंस करून तेथे मिशनऱ्यांनी मेरीच्या मूर्तीची स्थापना केली. १९५०- ५१ सालीं म्हणजे स्वातंत्र्यानंतर केरळमध्ये ख्रिश्चन पाद्रयांनी दीडशे हिंदु मंदिरांचा विध्वंस केला, हें तेथील ख्रिश्चन गृहमंत्र्यानेच विधानसभेत सांगितलें होतें. मंदिर-विध्वंसाची ख्रिश्चनांना खंत तर वाटत नाहीच, उलट त्यांत ते अजूनहि भूषण मानतात. युकॅरिस्ट काँग्रेसच्या वेळीं पोपमहाशय मुंबईला आले होते. त्या वेळीं वांद्रे येथील माऊंट मेरीचें देऊळ त्यांना दाखवून, पूर्वी येथलें दुर्गेचें मंदिर पाडून त्यावर हें चर्च उभारलें आहे, असें येथल्या ग्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांना अभिमानाने सांगितलें.
 भारत सरकारने पोर्तुगीज सत्तेपासून गोवे मुक्त केलें त्या वेळीं तेथील कांही ख्रिश्चनांनी चार शतकांपूर्वी गोव्यांतील जनतेवर धर्मांतरासाठी अमानुष अत्याचार करणारा जो 'संत' फ्रॅन्सिस झेवियर त्याची चित्रे छापून लोकांना वाटली. त्या चित्रांत झेवियरच्या पायाखाली बुद्धमूर्ति पालथी पडलेली दाखविलेली आहे.

 इ. शा. १७