पान:इहवादी शासन.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५६ । इहवादी शासन
 

आपण निरनिराळा विचार करूं. त्यांत ख्रिश्चन मिशनरी यांचा क्रम पहिला. कारण अत्यंत प्रभावी असा हा वर्ग आहे. बहुसंख्य ख्रिश्चनांवर त्यांचेच वर्चस्व आहे.
 ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या सर्वधर्मसमानत्वावर मुळीच विश्वास नाही. धर्म- सहिष्णुता या शब्दांचेंच त्यांना वावडें आहे. महात्मा गांधींची अनेक ख्रिश्चन मिशनऱ्यांशीं हार्दिक मैत्री होती. महात्माजींच्याविषयी त्यांना आदरहि असे. पण त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा, असा त्यांना ते नेहमी आग्रह करीत. कारण तोच एक खरा धर्म असून, त्याच्या आश्रयावांचून मनुष्याला मुक्ति मिळणे अशक्य आहे, असें त्यांचें मत आहे. महात्माजींनी स्वतःच याविषयीच्या हकीकती लिहून ठेवल्या आहेत. कोटस् नांवाच्या त्यांच्या क्वेकरपंथीय मित्राला त्यांच्या आत्म्याविषयी चिंता वाटे. कारण त्यांनी येशूचा धर्म स्वीकारण्यास नकार दिला होता. (ख्रिश्चन मिशनस्– म. गांधी, नवजीवन प्रेस, पृष्ठ २१).

आक्रमण हेंच धोरण

 'टेंपल ऑफ अंडरस्टँडिंग' यासारख्या संस्था धर्मसमानत्व प्रस्थापिण्याच्या हेतूने प्रस्थापिल्या जातात. पण त्यांच्या परिषदांतील भाषणांवरून त्यांचें अंतरंग कळून येतें. रेव्हरंड फॅलन म्हणाले, "आपण आस्तिक, ईश्वरनिष्ठ लोक इतरांना आपल्या धर्माचीं तत्त्वें किती शिकवूं शकतों यावर संस्थेचें यश अवलंबून आहे." 'ख्रिश्चॅनिटी इन् चेंजिंग इंडिया' या पुस्तकांत स्पष्ट म्हटलें आहे की, "ख्रिश्चॅनिटीला तडजोड, देवाणघेवाण माहीतं नाही, आक्रमण हेंच तिचें धोरण आहे. इतर धर्मांचा सहानुभूतीने विचार करावा, त्याचें रहस्य जाणून घ्यावें, यासाठी कितीहि प्रयत्न चालू असले तरी बहुसंख्य मिशनरी अजून हिंदु धर्म हा शत्रु असून त्याचा पाडाव केलाच पाहिजे या वृत्तीचे आहेत." पोप आणि त्यांचे सहकारी यांचा एकच मंत्र आहे, "रोमन कॅथॉलिझम हा एकच सत्य धर्म आहे."
 माजी केन्द्रमंत्री राजकुमारी अमृतकौर या ख्रिश्चन होत्या आणि स्टॅन्ले जोन्स हे स्वतःच मिशनरी आहेत. या दोघांनीहि ख्रिश्चन मिशनरी हे अत्यंत असहिष्णु व हट्टाग्रही आहेत, त्यांनी भारताची व त्याबरोबरच ख्रिश्चन धर्माची हानि केली आहे, असेंच मत मांडलें आहे. महात्माजींना लिहिलेल्या पत्रांत अमृतकौर लिहितात, "धर्मांतराचा प्रयत्न म्हणजे मला हिंसाचार वाटतो. पण ख्रिश्चन मिशनऱ्यांचें तेंच उद्दिष्ट असतें. तुम्ही त्यांना धर्मसमानत्वाचें तत्त्व शिकवीत आहांत, हें आमच्यावर मोठे उपकार आहेत. वास्तविक हिंदभूमीची लेकरें या अर्थाने आपण सर्व हिंदूच नाही का? माझ्या मतें हिंदु धर्माच्या विशाल कक्षेत जीझसचाहि सहज समावेश होईल. ख्रिश्चनांनी अंतर्मुख होऊन विचार केला, तर त्यांना हें पटेल असें वाटतें आणि मग सहिष्णुता व शालीनता या वृत्ति त्यांच्या ठायीं बाणतील. या वृत्ति म्हणजेच सर्व धर्मांचें सार आहे." (ख्रिश्चन मिशन्स, पृष्ठे १२४, १२५).