पान:इहवादी शासन.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५२ । इहवादी शासन
 

 विष्णुशास्त्री तर म्हणाले की, "परमेश्वराने दिलेल्या या शक्तींना अनर्थावह म्हणणें हें धर्माच्या दृष्टीने पाप व न्यायाच्या दृष्टीने मूर्खत्व होय." प्रवृत्तिधर्म तो हाच. गेल्या शंभर वर्षांत राममोहन राय, रानडे, आगरकर, दयानंद, विवेकानंद, सावरकर यांनी याच धर्माचा उपदेश केला. लो. टिळकांनी गीतारहस्य लिहून हजार- बाराशे वर्षे या समाजाच्या मनावर बसलेली आचार्यप्रणीत निवृत्तिधर्माची पकड ढिली केली.
 उपनिषदांत एका झाडावर बसलेल्या दोन पक्ष्यांची गोष्ट आहे. एक पक्षी संसारवृक्षाचीं फळें खाऊन दु:खी होतो, दुसरा त्यांपासून अलिप्त असल्यामुळे सुखी असतो. अरविंदवाबूंनी ही गोष्ट आता राष्ट्रीय मोक्षाच्या अर्थाने पुन्हा सांगितली. "परकी राज्य ही संसारमाया होय, त्यांतील सुखविलास खरे मानून आम्ही मोहित झालों. पण संसारवृक्षाच्या शेंड्याला बसलेला दुसरा पक्षी म्हणजे स्वराज्य- तोच आमचा अंतरात्मा आहे, हें ज्ञान आता आम्हांला झाले आहे. हें ज्ञान हीच परमेश्वरी शक्ति होय. आमचें राष्ट्र आता त्या परमेश्वरी शक्तीने भारलेले आहे आणि आमची सर्व बंधनें तुटून पडून हिंदुस्थान सर्व जगांत स्वतंत्र राष्ट्र म्हणून नांदू लागेपर्यंत त्या शक्तीला कोणी रुद्ध करूं शकणार नाही."

नवयुगाचें दर्शन

 पूर्वी राम-सीता, कृष्ण-रुक्मिणी यांच्या ऐहिक चरित्रावर आध्यात्मिक रूपकें कवि चढवीत असत. आता उपनिषदांतील आध्यात्मिक रूपकांचा भारतीय नेते इहवादी अर्थ वसवूं लागले. युग पालटलें, नवें मन्वंतर आलें असा याचा निश्चित अर्थ आहे. या नव्या युगाचीं विविध लक्षणें आता पाहवयाची आहेत. 'अर्थ- कामां'च्या प्रेरणेने ब्रिटिशांच्या आधीच्या सात-आठ शतकांतहि भारतांत कर्तृत्वाचे नवे उन्मेष मधून मधून येत असत; पण युरोपांत मार्सिग्लिओ, वायक्लिफ, इरॅस्मस, लुथर यांनी इहवादाचें जें तत्त्वज्ञान सिद्ध केलें, तसें भारतांत कोणी केलें नाही. कोणीं पतितशुद्धि केली, कोणीं समुद्रपर्यटन केलें, कोणीं अस्पृश्याघरीं जेवण केलें तरी त्या कृति तेवढ्या व्यक्तींपुरत्याच राहत. तें करणें योग्य आहे, वेदस्मृति त्याच्याविरुद्ध असल्या तरी योग्य आहे, आमच्या बुद्धीच्या, विवेकाच्या आदेशाप्रमाणे आम्ही वागणार, असा निर्धार प्रकट करून त्या नव्या आचाराच्या समर्थनार्थ कोणी ग्रंथ लिहिले नाहीत.
 तत्त्वज्ञान सांगितलें गेलें तें सर्व अध्यात्माचें, मोक्षाचें परलोकाचें. इहवादाचें समर्थन लांबच राहिलें, त्याचा सर्वत्र निषेध केला जात असे. म्हणून कांही व्यक्तींनी क्वचित् कोठे आचारपरिवर्तन केलें असले, तरी समाज-मनांत परिवर्तन झालें नाही. लेख-ग्रंथ या रूपाने तात्त्विक समर्थन केल्यावांचून असें परिवर्तन घडत नाही. जनमानसांत क्रान्ति होत नाही. आता लोक निर्भयपणें तसें समर्थन करूं लागले हेंच मुळी मन्वंतराचे पहिले लक्षण होय.