पान:इहवादी शासन.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भारतांतील
इहवादी शासन




 मागील तीन प्रकरणांत सोव्हिएट रशिया, मुस्लिम देश व पश्चिम युरोप येथील इहवादी शासनांचा विचार केला. आता भारतांतील इहवादाचा विचार करावयाचा आहे. तो करतांना प्रथम भारताच्या प्राचीन इतिहासाकडे लक्ष जाणें अपरिहार्य आहे. पश्चिम युरोपांतील इहवादाचा विचार करतांना प्रथम आपण युरोपचा प्राचीन इतिहास पाहून ग्रीसमधील इहवादाचा परामर्श घेतला. पाश्चात्त्य इहवादाचा तेथपर्यंत आपल्याला मागोवा लागला. भारतांतील इहवादाचा परामर्श घेतांना आपल्याला तेंच धोरण अवलंबिलें पाहिजे.
 त्या दृष्टीने भारताच्या प्राचीन इतिहासाकडे पाहण्यापूर्वीच एक सिद्धान्त मनांत येतो. भारताचा प्राचीन इतिहास अत्यंत वैभवशाली आहे. धर्म, विद्या, कला, कृषि, व्यापार, राजनीति, पराक्रम या सर्वच क्षेत्रांत भारताने उत्कर्षाचें शिखर गाठले होतें आणि ज्या अर्थी या भूमीने असा अभ्युदय पाहिला होता त्या अर्थी येथले शासन इहवादी असलेच पाहिजे, इतकेंच नव्हे तर येथल्या जनतेवरहि इहवादाचे संस्कार झाले असलेच पाहिजेत, हा तो सिद्धान्त होय. येथपर्यंत इहवादाचें जें विवेचन केलें आहे त्यावरून इहवादाची मूलतत्त्वें व त्यांचें महत्त्व जर वाचकांनी ध्यानांत घेतलें असेल तर वरील सिद्धान्त त्यांना सहज मान्य होईल असें वाटतें.
 कर्माकर्माचा निर्णय करतांना, समाजोत्कर्षाची चिंता वाहतांना, प्रत्यक्ष इतिहास, देशकाल पाहून निर्णय करावयाचे; तसे करतांना अनुभव, तर्क, अवलोकन यांचा आश्रय करावयाचा, धर्मग्रंथांतील अंध सिद्धान्ताचें वर्चस्व मनावर येऊ द्यावयाचें नाही, हा साधारणतः इहवादाचा मथितार्थ आहे आणि तो ध्यानीं घेतां इहवाद व अभ्युदय यांत दृढ कार्यकारण संबंध आहे, हा सिद्धान्त कोणत्याहि देशाच्या इतिहासांत अबाधितच राहील, यांत शंका नाही. भारताच्या प्राचीन इतिहासासंबंधी तर असे निश्चित विधान करण्यास भरपूर प्रमाणें उपलब्ध आहेत.