पान:इहवादी शासन.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाश्चात्त्य देश । १०५
 

 ते प्रयत्न हाणून पाडून बुद्धिप्रामाण्य, विवेकस्वातंत्र्य, प्रवृत्तिपरता आणि मूळ बायबलातील शुद्ध, सात्त्विक धर्म यांचा पुरस्कार करणारे व त्यापायीं प्राणदंडहि सोसणारे धर्माचार्य, पंडित व तत्त्ववेत्ते युरोपांत अखंड उदय पावत राहिले म्हणून अंध धर्मसत्तेपासून मुक्त होऊन वैभवाच्या शिखरावर तो आरूढ होऊ शकला. गेल्या पांच-सहा शतकांचा युरोपचा इतिहास म्हणजे प्राधान्याने या अंध धर्मसत्ता व इहवाद यांच्या संघर्षाचा इतिहासच आहे. तोच आता पाहवयाचा आहे.

पुनश्च हरिः ॐ

 फ्रान्सच्या फिलिपने पोपला कैद करून ॲन्हिग्नॉन येथे राहवयास भाग पाडलें, त्यामुळे एका धर्मपीठाचीं दोन व पुढे तीन पीठे झाली. त्या पीठांचे तीन पोप, आपणच खरे पोप असा दावा करून परस्परांशी भांडूं लागले. यामुळे त्या पीठाला प्रतिष्ठा, अब्रू अशी राहिलीच नाही. पश्चिम युरोपांतील विचारी धर्माचार्यांना व सत्ताधीशांना याची फार चिंता वाटून, त्यांनी एक धर्ममहामंडळ स्थापन केलें. पोपच्या पीठाची शुद्धि करणें व पोपच्या सत्तेवर कायमचें नियंत्रण घालून ती घटनाबद्ध करणें हीं या मंडळाची दोन उद्दिष्टें होतीं.
 ही चळवळ युरोपच्या इतिहासांत 'कन्सिलियर मुव्हमेंट' म्हणून प्रसिद्ध आहे. १४०९ ते १४४३ या दीर्घ काळांत धर्म महामंडळाची चार मोठीं अधिवेशनें झाली. पण त्यांतून फलनिष्पत्ति कांही झाली नाही. मंडळाने भिन्न पीठांवर असलेल्या पोपना पदच्युत केलें आणि रोमच्या पीठावर सहावा अलेक्झांडर याची नियुक्ति केली. हा पोप प्रत्यक्ष सैतानच होता. आपल्या सत्तेवर नियंत्रण बसविण्याची कल्पना त्याला मान्य होणें अशक्यच होतें. त्याने नाना कारस्थानें करून मंडळाच्या सभासदांत फूट पाडली व मंडळाला निर्बल करून टाकले; शिवाय मंडळाचें एकंदर सर्व ख्रिस्ती विश्वाची एकसूत्री व्यवस्था करण्याचें जें धोरण, तें स्वतंत्र राष्ट्रभावनेने प्रेरित झालेल्या राजकीय सत्ताधीशांना मान्य नव्हतें. रोमचें धर्मपीठ अत्यंत भ्रष्ट होतें. पण तें शुद्ध व सात्त्विक झालें असतें, तरी त्याची सत्ता आता राष्ट्रीय शासनांना असह्यच झाली असती.
 पोपवर नियंत्रण किती घालावें याविषयी धर्माचार्यांतहि मतभेद होते. त्यामुळे रोमचें धर्मपीठ घटनाबद्ध करण्याचा हा प्रयत्न फसला व पोपची धर्मसत्ता पूर्वीप्रमाणेच सुलतानी व मदांध होऊन वसली. पण प्रबोधन-युगाने निर्माण केलेल्या प्रेरणा अजून पूर्ण जिवंत होत्या. तेव्हा त्यांनी प्रेरित असे जे धीरपुरुष त्यांनीहि या भ्रप्ट, अंध, जीर्णवादी सत्तेशीं मुकाबला करण्यासाठी पुनश्च हरिः ॐ म्हणून शुद्ध धर्मतत्त्वांचा घोष सुरू केला.

मुक्तिपत्रकांवर भडिमार

 या धीरपुरुषांचा अग्रणी म्हणजे मार्टिन लूथर हा होय (१४८३- १५४६). तरुणपणींच याने 'सेंट ऑगस्टाइन' या मठांत जाऊन जोग घेतला होता. पण त्याचें