Jump to content

पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९३
इस्लाम आणि समाजशास्त्र

झाल्यानंतर तो कायमचा परतंत्र समजला जाई. त्याला स्वतंत्र करावयाचे झाल्यास त्याची किंमत द्यावी लागे. प्रत्येक मुस्लिमानें अशी किंमत देऊन कैदी झालेल्या कट्टर शत्रूंचेही स्वातंत्र्य अबाधित ठेवावें अशी उदार घोषणा इस्लामने केली आहे. पवित्र कुराणच्या दुसऱ्या अध्यायांत (ऋचा १७७) "लढाईत कैदी झाल्यामुळे गुलाम बनलेल्या शत्रूना मुक्त करण्यासाठी, केवळ परमेश्वराच्या प्रेमाकरितां, पैसा खर्च करणे ही श्रेष्ठ दर्जाची धर्मशीलता आहे" असा स्पष्ट आदेश देण्यांत आला आहे. गुलामांना स्वातंत्र्य प्राप्त करून देणे, हा आपण केलेल्या दुष्कृत्याचे किंवा पापाचे परिमार्जन करण्याचा मार्ग आहे असें इस्लाम धर्म समजतो. एकदां एक गृहस्थ हजरत पैगंबरांकडे आला आणि त्याने विचारले की, नरकापासून मुक्त होऊन स्वर्गप्राप्ति होण्याचा मार्ग कोणता? हजरत पैगंबरांनी उत्तर दिले, "गुलामांना मुक्त करणे किंवा त्यांना स्वातंत्र्य प्राप्त करून देणे हाच मार्ग होय."
 इतर धर्माप्रमाणे इस्लाम धर्मानेंही पुण्याचे मार्ग सांगितले आहेत. पवित्र कुराणमध्ये पुण्याईचा राजमार्ग कोणता याविषयी जे सुंदर विवेचन करण्यांत आले आहे, त्यामध्ये गुलामांच्या मुक्ततेस अग्रस्थान देण्यात आलेले आहे हे लक्षात ठेविले पाहिजे.

 "पुण्याईचा राजमार्ग कोणता? तर गुलामांना मुक्त करणे, अनाथ मुलांना किंवा धुळीत पडलेल्या गरिबांना दुष्काळाच्या दिवसांत अन्न देणे होय."

-पवित्र कुराण ९०:१३.

 इस्लाम धर्माच्या या उदात्त शिकवणीमुळे गुलामगिरीचे लंगर