पान:इत्ता..इत्ता..पाणी.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिराचा जीव राखला.
 हिराला बाजेवर घालून पोरी आणि बायांनी घरी पोचवले.
 या गावाचं नाव आहे कुरणवाडी. डोंगरात वसलेलं हे गाव. शंभर सालाखाली इथे भरपूर झाडे होती. हिरवीगार कुरणे होती. हरेक घरात गायीगुरांची चंगळ असे. दूध दुभते भरपूर. पण अशात सारेच बदलले. चाळीस पन्नास सालात कुरणवाडी ओसाडवाडी झाली. जी कुरणवाडी पंधरा घरांची तिथे आज दोनशे उंबरे झालेत.
 एका एका घरात. दहा बारा पंधरा चुलत-मालत भावंडे. आणि हरेकाची चूल वेगळी. एक वाडा पण आत दहा चुलींचा मांडा. आता दोनशे चुलींना लाकूडफाटा भरपूर लागणार. मोकळी जागा दिसली की बांधा खोली. दारे-खिडक्यांसाठी लाकूड हवेच. शिवाय हर दोन सालांनी दुष्काळाचे सावट. गदा आली झाडांवर. हा. . हा. . म्हणता झाडे तोडली गेली. हिरवे मखमली डोंगर. बुढे नि बोडखे दिसू लागले.
 झाडांची मुळे पावसाचे पाणी धरून ठेवतात. झाडेच राहिली नाहीत,मग जमिनीत पाणी कसे राहणार? हिरवळ कशी झुलणार? अखेर विहिरीचे पाणी आटले. विहिरी बुजून ओसाड झाल्या.