पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/९१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८१ )
नारायणराव व्यंकटेश.

किल्ल्यात नुकताच आला होता त्यानें एकदां संधि साधून किल्ल्याबाहेर पडून त्यांचे दोन तीनशें माणूस मारिलें व त्यांच्या तोफा घेऊन त्यांस पिटून लावलें. इकडे धारवाडास गोपाळराव, विसाजी नारायण व हरिराम छावणीस राहिले होते त्यांनीं शिरहट्टीच्या देसायाचे पारिपत्य केलें व कोपळ व बहादुरबिंडा हे किल्ले तुंगभद्रेवर आहेत ते काबीज केले.
 नारायणरावतात्या हा लाडांत वाढलेला अनूबाईचा एकुलता एक मुलगा. त्याचे वडील व्यंकटराव यांनी त्यास लहानपणीच देशमुखीच्या कामांत घालून राज्यकारभाराचा ओनामा पढविला होता. तात्या वयांत येतात तो व्यंकटराव वारले. ते जिवंत असते तर तात्यांच्या स्वभावात जो शुरत्वाचा कांहीं अंश होता त्याचा विकास होऊन वडिलांच्या नजरेखाली ते कदाचित् स्वतंत्र सरदारीच्या कामास लायक झाले असते. वेळ प्रसंग पाहून यश मिळविण्याच्या अगर गमाविण्याच्या कारभारांत त्यांस मुद्दाम घालून त्यांच्या बुद्धीची व कर्तृत्वाची कसोटी त्यांच्या वडिलांनीं पाहिली असती; व चुका होतील त्या त्या ठिकाणीं बुद्धिवाद शिकवून त्यांस मार्गास लाविलें असते. परंतु दुर्दैवाने त्यांस एकविसावें वर्ष लागतें तोंच वडील मृत्यु पावून सर्व कारभार अनूबाईस पहाणे प्राप्त झाले. बाईची हिंमत, धोरण व महत्वाकांक्षा जबरदस्त होती. त्यांचे भाचे नानासाहेब पेशवे, भाऊसाहेब व दादासाहेब यांजवर त्यांची चांगली छाप होती. त्यांच्या लष्करांत प्रत्येक स्वारीत हजर राहून अनूबाईंनी आपले बेत सिद्धीस नेण्याची संधि कधीं गमावली नाहीं व या कामीं कधीं आळस केला नाहीं ! नारायणरावतात्यांस त्यांनी स्वतंत्रपणे कधीं वागू दिले नाही. ' हें लहान पोर, याला काय समजतें ! स्वतंत्रपणे कोणतेही काम याच्या हातून होणें नाही. आपण सांगू तेंच याने केलें तर याचें