पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(६७)
नारायणराव व्यंकटेश.

व वृद्धिंगत करण्याच्या कामीं योग्य दिसेल ती व्यवस्था करावी, व सर्व सरदारांत आपल्या कह्यांत वागवावें, असें या वडिलकीच्या अधिकाराचें स्वरूप होतें. पण एवढ्यावरून केवळ आनियंत्रित सत्ता चालविण्याची सनद त्यांस शाहूमहाराजांकडून मिळाली असें मात्र कोणीं समजूं नये. त्यांच्या अधिकारास मर्यादा व बंधनें कशी घालून दिलेली होतीं या विषयीं पुढें लिहिण्यांत येईल.
  भोंसल्यांच्या घराण्यांतून मराठी साम्राज्याचीं सूत्रें पेशव्यांच्या घराण्यांत कशीं गेलीं याचा इतिहास याप्रमाणें आहे. शाहूमहाराजांच्या मरणाआधीं व नंतर यासंबंधे ज्या गोष्टी घडल्या त्यांचें विवेचन थोडक्यांत करितां येण्याजोगें आहे. राणी सकवारबाई यांस पेशव्यांच्या हातीं राज्य जाणार ही गोष्ट अर्थातच खपली नाहीं व रामराजे गादीवर बसल्यास ताराबाईंचे प्रस्थ वाढेल हेंही त्यांस भय पडलें. त्यांनी प्रतिनिधींस सामील करून घेऊन निराळेंच कारस्थान तयार केलें. त्यांनी संभाजीमहाराजांस सांगून पाठविलें कीं, महाराज वारल्याबरोबर तुम्ही कोल्हापुराहून जलदीनें येऊन राज्य हवालीं करून घ्यावें. आम्ही सरदार व फौज अनुकूळ करून घेत आहों व तुम्हांस मदत करण्यास सिद्ध आहों. या गोष्टीस संभाजीमहाराजांचा रुकार मिळाला व त्यांनीं करवीरास फौजेची तयारी सुरू केली. पेशव्यांविषयीं सकवारबाईस अतिशय द्वेष उत्पन्न होऊन त्या बाईनीं त्यांस मारेकरी घालून ठार मारण्याचासुद्धां बेत योजिला होता! रामराजे साताऱ्यास येतांच त्यांच्या जिवास दगा करावा असाही त्यांचा बेत होता. राजवाडयांत त्यांनीं असा पक्का बंदोबस्त केला होता कीं, आपणास कळल्याखेरीज महाराजांची व कोणाही परक्या मनुष्याची गांठच पडूं नये. अशाही अडचणींत पेशव्यांनीं महाराजांची गुप्तपणें गांठ घेतली व त्यांपासून एक स्वदस्तुरचें पत्र लिहून