पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४४ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

तह झाला तेव्हां तो मुलूख शाहूमहाराजांच्या हातीं मुळींच नव्हता. व पुढें तो संभाजीमहाराजांनींही घेण्याचा यत्न केला नाहीं. तो मुलूख दुसऱ्याच्या हातीं जाणार असें पाहतांच शाहूमहाराज व त्यांचे पेशवे यानीं आपला अंमल बसविला व त्याची वांटणी करवीरकरांस कांहींएक दिली नाहीं.

 कलम ७. या कलमांत लिहिलेल्या मुलुखाचीही गोष्ट बहुतेक अंशीं ६ व्या कलमांत लिहिलेल्या हकीकतीसारखीच आहे.

 कलम ९. प्रांत मिरज व विजापूर येथील ठाणीं अथणी तासगांवसुद्धां उदाजी चव्हाणाच्या स्वाधीन असल्यामुळें संभाजीमहाराजानीं तीं शाहूमहाराजांच्या स्वाधीन केलीं नाहींत. शाहूमहाराज व त्यांचे पेशवे यानीं तीं ठाणीं चव्हाणापासून परस्पर घेतलीं व मिरजेचा किल्ला मोंगलांच्या ताब्यांत होता तो खुद्द शाहूमहाराजानींच काबीज केला.

 तहाच्या कलमांची याप्रमाणें वासलात लागलेली आहे. या तहानें करवीर राज्याची कांहीं वाढ झाली असें दिसत नाहीं, तहापूर्वी तें जेवढें होतें तेवढेंच अद्यापर्यंत राहिलें आहे. किंबहुना तें थोडें बहुत कमीच झालेलें आहे.

 द्वारकाबाई व राणोजी घोरपडे सेनापति हीं संभाजीमहाराजांवर रुसून साताऱ्यास शाहूमहाराजांच्या आश्रयास जाऊन राहिल्याचें मागें लिहिलें आहे. तीं तेथेंं गेल्यावर महाराजांनी त्यांस सन्मानानें आपणाजवळ ठेवून घेतलें होतें. राणोजी घोरपडे यांस सरंजामाचे महाल नवीन नेमून देऊन त्यांच्या सरदारीची स्वतंत्र उभारणी करावी, त्यांस नवीन इनाम गांव द्यावे, व त्यांच्या नांवें देशमुखी-सरदेशमुखीचें वतन दिल्याच्या सनदा द्याव्या, याप्रमाणें महाराजांचा मनोदय होता व त्या-