पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४५ )
व्यंकटराव नारायण.

प्रमाणें सरंजामाच्या सनदाही तयार झाल्या होत्या. परंतु पुढें लौकरच संभाजीमहाराजांकडून समेट करण्याविषयीं संदर्भ आल्यावरून घोरपडयांच्या सरदारीचें काम तितकेंच थांबलें. पुढें संभाजीमहाराज शाहूमहाराजांच्या भेटीकरितां साताऱ्यास आले त्या वेळीं थाटमाटाचा समारंभ होऊन त्यांस पुष्कळ दिवस शाहूमहाराजांनी आग्रहानें ठेवून घेतलें. त्या वेळीं तुम्ही कापशीस परत या, तुमचें संस्थान तुम्हांकडे चालवितों, असें संभाजीमहाराज द्वारकाबाईस व राणोजीस म्हणूं लागले. परंतु शाहूमहाराज व त्यांचे पेशवे बाजीराव यांची हमी घेतल्याखेरीज तीं दोघे परत जाण्यास कबूल झाली नाहींत. शेवटीं पेशवे,स. १७३०प्रतिनिधि व मंत्री यांस बरोबर घेऊन शाहू महाराज राणोजीच्या घरीं गेले व तुमचें संस्थान चालविण्याबद्दल आम्ही संभाजीमहाराजांस सांगितलें आहे ते त्याप्रमाणें बिनदिक्कत चालवितील, तुम्हीं कापशीस जावें, असें त्यांनी व प्रधान मंडळीनीं त्यांस व द्वारकाबाईस आग्रहानें सांगितले. त्यावरून तीं दोघें कापशीस परत गेलीं व कबूल केल्याप्रमाणें संभाजीमहाराजांनी त्यांचें संस्थान त्यांस परत दिलें.
 व्यंकटरावांचे पुत्र नारायणरावतात्या हे आतां म्हणजे सन १७३१ च्या सुमारास ६ | ७ वर्षाचे झाले होते. त्यांची मुंज झाल्यावर लौकरच लग्नही झालें. त्यांच्या स्त्रीचें नांव लक्ष्मीबाई. त्या काळीं पुस्तकी विद्या शिकून व तींत परीक्षा देऊन तयार झालेल्या लोकांचा मुलकी अगर लष्करी कामांत कांहींच उपयोग होत नव्हता, त्यामुळें तशी विद्या शिकण्याच्या शाळाही नव्हत्या. ज्याला कारकून अथवा मुत्सद्दी अथवा सरदार व्हावयाचें असेल त्यानें तें तें काम उमेदवार या नात्यानें अगदीं खालच्या पायरीपासून शिकलें पाहिजे अशी त्या काळची वहिवाट होती. सरदार लोक मुलें लहान आहेत तोंपासूनच