पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २५ )
नारो महादेव.

व हरिभटजीबावा यांचे पुत्र त्र्यंबक हरि कुरुंदवाडकर यांस व्यंकटरावांचे दिवाण नेमून दिलें. तर्फ आजरें येथील देशमुखी बहिरजी हिंदुराव घोरपडे यांच्या वांटणींत गेली होती. परंतु इकडे त्यांचें वतन संभाळण्यास कोणी नसल्यामुळें त्यांनी ती नारोपंतांस इनाम दिली. आजरें परगण्याच्या एकतर्फी खेडयांची वहिवाट फौजेच्या खर्चासंबंधें कापशीकरांकडून नारोपंतांकडे आली ती यानंतर तीन चार वर्षांनीं आली असावी.
 सन १७१४ मध्यें ताराबाईंचे पुत्र शिवाजी महाराज मरण पावले. ते मरण्यापूर्वी त्यांस व त्यांच्या भवानीबाई व पार्वतीबाई या दोन्ही स्त्रिया व आई ताराबाई यांस कैदेंत ठेवून राजसबाईंचे पुत्र संभाजीमहाराज * यांस गिरजोजी यादव व पन्हाळ्याचे गडकरी यानीं गादीवर बसविलें होतें. ताराबाईंचे सर्व बेत जागच्या जागीं राहून त्यांस कैदेंत रहावें लागले तरी त्यानीं योजिलेला शाहू महाराजांशीं वैर करण्याचा संकल्प नवीन कारकीर्दीच्या अधिकाऱ्यानीं सोडून दिला असें मात्र नाहीं ! उलट ताराबाईची ढवळाढवळ बंद झाल्यामुळे त्यांस अधिक उत्तेजन येऊन करवीरच्या नवीन राज्याची उभारणी करण्यास ते अधिक दक्षतेनें उद्युक्त झाले. त्या कामीं नारोपंतांचे त्यांस पूर्ण पाठबळ होतें. करवीरच्या छत्रपतींकडून नारोपंतांस यापूर्वीच सचिवाचें पद


  • शिवाजी महाराज मृत्यु पावल्यावर संभाजीमहाराजांस गादीवर बसविण्यांत आलें असें डफ् साहेब म्हणतात तें चूक आहे. तसेंच रामराजे हे पार्वतीबाईंचे पुत्र असतां ते भवानीबाईचे पुत्र म्हणून लिहितात डफ् साहेब तेंही चुकलें आहे. ( राजवाडे प्रकाशित खंड ८ मध्यें रामराजांचे वगैरे पत्रे छापिली आहेत ती पहा.) रामराजांविषयीं पुढे लिहिण्यांत येईल. शिवाजीमहाराज स. १७१२ त वारले व रामचंद्रपंतानी संभाजी महाराजांस गादीवर बसविलें, हीं डफ् साहेबांचीं दोन विधानेंसुद्धा चुकलीं आहेत.