पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १८ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

तिजपासून औरंगजेबास जरी त्रास होत होता तरी त्याच्यानें घोरपडयांचा बंदोबस्त झाला नाही. या वेळीं नारो महादेव यांची तेजस्विता उत्तम रीतीनें प्रकट झाली व "घोरपडयांचे नांव करून निशाण रक्षिल्या" बद्दल त्या वेळच्या लोकांत त्यांचा मोठा लौकिक झाला.
 सन १७०७ त घोरपड्यानीं स्वराज्यांतच कांहीं स्वारी-शिकारी वगैरे आवाडाव केल्यावरून ताराबाईंचा क्षोभ होऊन त्यांचें पारिपत्य करण्याकरितां त्यांनी त्यावर नवीन सेनापति धनाजी जाधव यांस पाठविलें; तेव्हां घोरपडयानींही औरंगजेबाचा नामांकित सरदार झुलपिकारखान यांस मदतीस बोलाविलें. संताजीराव यांची व खानाची मैत्री फार दिवसांची होती, सबब त्यानें घोरपडयांच्या कुमकेस जाऊन जाधवरावास हुसकून लाविलें. त्यानंतर बहिरजी घोरपडे व त्यांचे पुत्र शिदोजीराव हे संताजीरावांच्या मुलांमाणसांस घेऊन गजेंद्रगडाकडे गेले. याउपर इकडे देशीं न राहतां मोंगलांचा आश्रय करून कर्नाटकांत स्वाऱ्या कराव्या व तिकडे आपला अंमल बसवावा असें त्या पितापुत्रांनीं योजिलें.
 घोरपडयानीं स्वराज्यांतल्या मुलाखवर स्वारी केल्याचें वर लिहिलें आहे त्यात नारो महादेव यांचें अंग नव्हतें. मोंगलांचे अंकित म्हणवून घेऊन कर्नाटकांत रहावें ही गोष्ट नारोपंतांस मुळींच पसंत पडली नाहीं. छत्रपतींच्या पदरीं राहूनच आपल्या धन्यानें मिळेल त्या भाकरीवर निर्वाह करावा हा त्यांचा निर्धार पूर्वीपासून पक्का होता यामुळें आतां घोरपडयांची वाटणी होऊन त्यांच्या कर्तृत्वास भिन्न भिन्न दिशा लागल्या. बहिरजीराव व शिदोजीराव हे गजेंद्रगडास राहून मोंगलाईचे सरदार म्हणून आपणास म्हणवून घेऊं लागले, व तिकडे त्यानीं गुत्ती वगैरें मुलूख मोंगलांकडून सरंजाम मिळविला;