पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१७२)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

 या वादांत इचलकरंजीकरांचें म्हणणें खरें आहें असें सरकारचें मत झालें व धारवाडचे सरकलेक्टर वेबरसाहेब यानीं सरकारचा तो निकाल ता०१ सप्टंबर स.१८३५ रोजी व्यंकटरावांस कळविला.
 ता. २९ नोव्हेंबर स.१८३७ रोजीं बुवासाहेबमहाराज कैलासवासी झाले. ते तुळजापुरच्या यात्रेस गेले असतां येवती नजीक पंढरपूर येथें त्याचें देहावसान झालें. त्यांस दोन पुत्र होते, त्यांपैकीं थोरले पुत्र शिवाजीमहाराज करवीरच्या गादीवर बसले.
 व्यंकटराव रावसाहेब ता. १६ फेब्रुवारी स. १८३८ रोजीं वारले. त्यांची पहिली स्त्री रमाबाई ती चिंतामणराव आपासाहेब सांगलीकर यांची कन्या. ती वारल्यावर व्यंकटरावानीं दुसरें लग्न केले ती स्त्री रामदुर्गकर भावे यांची कन्या अन्नपूर्णाबाई. दोघींसही कांहीं अपत्य झालें नाहीं.
 व्यंकटरावांमागून त्यांचे धाकटे बंधु केशवराव तात्यासाहेब इचलकरंजी संस्थानाचे मालक झाले, त्यांची कारकीर्द सुरू झाल्यावर लवकरच सावंतवाडी संस्थानांत फोंड सावंताचे बंड सुरू झाले.आजरें तालुक्यांतून सावंतवाडीकडे जाण्याचा रस्ता आंबवली घांटांतून आहे. त्या घांटाच्या माथ्यावर आंबवली हा गांव इचलकरंजीकरांचा होता तेथें राहून तो फोंड सावंत आजरें तालुक्यांतल्या व सावंतवाडी संस्थानांतल्या गांवांवर घाले घालीत असे. त्याचा बंदोबस्त करण्याचे सामर्थ्य दोन्ही संस्थानांत नव्हतें. पुढें इंग्रजसरकाराने फौज पाठवून फोंड सावंताचें बंड मोडून टाकिलें.
 आंबवली व गेळें हे दोन गांव आजरें तालुक्यांतले असून पूर्वी मनोहरगडच्या घेऱ्यांत मोडत असल्यामुळें दुतर्फी अमलांतले होते.