पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१६६)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

करवीरकरांशी असले हे कलहं पिढ्यान पिढ्या चालत आले असल्यामुळें व्यंकटराव रावसाहेबांस करवीरकरांच्या स्वारीची गोष्ट नवीन नव्हती! त्यानीं इंग्रजसरकारास वारंवार पत्रें लिहून व तांतडीनें कारकून पाठवून आपल्या संस्थानाचा बचाव करण्याविषयी विनंती केली व महाराज जबरीनें इचलकरंजी घेऊं लागतील तर त्यांचें निवारण करावें म्हणोन फौजही जमा केली. त्या प्रसंगीं त्यांनीं आपलीं मुलेंमाणसें सुरक्षितपणाकरितां पटवर्धनहद्दींत हरिपुरास लावून दिली होतीं. फौज जमा करून कोणाशीं कलह करणें, अगर कलह करण्यास कुमक करणें, ही गोष्ट जरी इंग्रजसरकारानें सक्तीनें मना केली होतीं, तथापि आपले यजमानांवर आलेला हा आणीबाणीचा प्रसंग पाहून चिंतामणराव आपासाहेब सांगलीकर व गोपाळराव रावसाहेब जमखंडीकर यानीं व्यंकटरावांस फौजेची थोडीबहुत कुमक केली व महाराजांच्या स्वारीचें अरिष्ट दूर करण्याविषयी सरकारांत वारंवार लिहून कळविलें. कागलकर व भाऊमहाराज व चिंचणीकर यांचेही बोभाटे सरकारांत गेले होतेच. महाराजांची कानउघाडणी सरकारांतून वारंवार झाली असता ते मुळींच जुमानीनात, तेव्हां निरुपायानें महाराजांचें पारिपत्य करण्याचा विचार करणें इंग्रजसरकारास भाग पडलें. स० १८२७ च्या सप्टेंबर महिन्यांत धारवाडचे सरकलेक्टर निसबेटसाहेब हे फौज घेऊन धारवाडाहून निघून कोल्हापुराकडे चाल करून आले. त्यांची स्वारी भोज येथें येऊन उतरली तेव्हां घेतलेलीं ठाणीं टाकून व इचलकरंजीचा शह सोडून महाराजानीं थेट कोल्हापूर गांठलें! आजरें तालुक्यांत गेलेली फौजही दहशत खाऊन तिकडचीं ठाणीं टाकून कोल्हापुरास परत आली.
 मग इंग्रजी फौज कोल्हापुरासमीप येऊन उतरली तेव्हां महाराजांनी निसबेटसाहेबाशीं नम्रपणानें भाषण करून झालेल्यां गोष्टींबद्दल आपणास पश्चात्ताप झाल्याचे कळविलें.