पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१६५)
तिसरे व्यंकटराव नारायण.

 इचलकरंजी संस्थान खालसा करण्याचा अधिकार आपणास नाही असें इंग्रजसरकार म्हणतें, तर तो अधिकार आपण मनगटाच्या जोरावर स्थापित करावा, असें बुवासाहेबमहाराजानीं मनांत आणिलें! आदल्या वर्षीच्या तहांत इचलकरंजीकर व कागलकर यांस आपण उपद्रव देणार नाहीं असें महाराजानीं लिहून दिलें असतांही त्या संस्थानांस सतावून सोडण्याचा त्यानीं संकल्प केला, व त्याप्रमाणें इंग्रजसरकार नको नको म्हणत असतांही स्वार, पायदळ, व तोफा वगैरे पोक्त सामान तयार करून बुवासाहेबमहाराज स्वारीस निघाले! महापुराचें पाणी आलें म्हणजें जसें तें नदीच्या पात्राबाहेंर पडून चोहोंकडे पसरून नासधूस करितें त्याप्रमाणे महाराजानीं जमविलेल्या १०००० प्यादे व ४००० स्वार अशा या प्रचंड जमावाची स्थिति होती. या फौजेनें कागलकर व भाऊमहाराज यांच्या गांवांत ठाणीं बसविलीं, व चिंचणीकर पटवर्धन यांचे भोज, एकसंबे वगैरे गांव घेऊन लुटले. नंतर स्वारीचा मुख्य उद्देश इचलकरंजी संस्थान काबीज करण्याचा होता त्यास अनुसरून निमी फौज घेऊन खुद्द महाराज इचलकरंजीवर चालून आले. व निम्मी फौज आजऱ्यांकडे रवाना झाली. आजऱ्यांकडे गेलेल्या फौजेनें मतिवडें, अर्जुनी, शिपूर,मडिलगें, खेड, भादवण या गांवांत ठाणीं घातलीं व लुटालूट करून फार खराबी केली. इचलकरंजीकडे आलेल्या फौजेने शिरढोण, लाट, रांगोळी व शिर्दवाड ही ठाणीं घेतली. तोफखान्यासुद्धां हें पांचहजार सैन्य शिरढोण व टाकवडें येथें उतरलें होतें. हें सैन्य दररोज इचलकरंजीवर चालून येई तेव्हां उभयपक्षी झटापटी होऊन कांहीं माणसें जायांजखमी होत.आजरें व इचलकरंजी या दोन ठाण्यांखेरीज महाराजानीं आतां सर्व संस्थान घेतलें होतें व इचलकरंजी काबीज करण्याचा त्यांचा पक्का निश्चय दिसून येत होता.