पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आदिवासींचे ग्रामदैवत

 एका इंग्लीश कवीने त्याचं नाव अलेक्झांडर पोप त्याने म्हटलं आहे की “The 'proper Study of mankind is man" याचा अर्थ माणसाचा अभ्यासच खऱ्या अर्थाने मानवजातीचा अभ्यास असतो. माणूस कळला की मानवी समाज कळतो. माणूस नावाचं सूत्र एकदा सापडलं की विविध मानवी समूहाची आपल्याला नीट ओळख होते. मानवी समूहा-समूहातील संबंध नाती गुंतागुंत त्यामुळे उलगडते. Man is the key of all social problems हेच खरं.

 'मानसा मानसा कधी होशीन माणूस
 लोभासाठी झाला; मानसा चारे कानूस'


 स्वार्थ हा माणसात जोपासलेला शाप आहे. लोभामुळेच त्याला माणूस बनता आलं नाही. हे या कवितांच्या ओळीतून बहिणाबाईनं सांगितलेल आहे. त्याच्याबद्दल आपण विचार केला तर अस लक्षात येतं की ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या गोष्टींना महत्त्व देऊन जर, आपण माणसाला घडवलं तर हे घडू शकेल, अन्यथा आज माणसानंच माणसाला नागवलं आहे. त्याचं माणूसपण हिसकावून घेतलेलं आहे.

 आदिवासी, भटक्या विमुक्त आणि अनेक उपेक्षितांवर, हे माणूसपण हिरावून घेतल्यानं यातनामय जीवन जगण्याची पाळी येऊन ठेपलेली आहे. समाजात काही माणसांचं जीवन सुस्थिर सुखी समृध्दीचं आहे. तर बहुसंख्यांकांच्या वाट्याला फक्त दुदैवी भोगच आलेले आहेत. उच्चभ्रू वर्गापर्यंत उपेक्षितांचं दुःख जाऊन पोहचत नाही.

 शेवटी गरीब, दरिद्री माणूस असला तरी त्याला एकाकी एकटेपणाचं जीवन जगता येत नाही. संस्कृतीच्या विरहीत त्याला अस्तित्वच उरत नाही. म्हणूनच त्यालाही आपल्या निष्ठा श्रध्दा जपाव्या लागतात. धर्मविधी, देवदेवता, निर्माण करुन त्यांची पूजा अर्चा करावी लागते. उपेक्षित बापुड्यांनीही आपलं जीवन असंच

३०