पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अॅम्ब्युलन्स ही कधीच दुरुस्त आणि गरीबांच्या कामाला उपलब्ध नसते. क्वचित चांगले अनुभवही येतात पण बहुधा गरिबांना सोलापुरी चादरीच्या झोळीत डीहायड्रेशन झालेला पेशंट घालून जिवंतपणी त्याची प्रेतयात्रा काढूनच हॉस्पिटल पर्यंत आणून घालावा लागतो. त्याने कोणतातरी झाडपाला खावून पोटाची भूक मारलेली असते आणि तीन दिवस भागवलेले असतात. हॉस्पिटलमध्येही जागा शिल्लक नसते मग कुठेतरी कॉटच्या खाली जमिनीवर, बाहेरच्या बाकड्यावर बसून पेशंटला ट्रीटमेंट घ्यावी लागते. तशी या भागात धनिकांची सेवाभावी वृत्तीने अनेक शिबिरे घेण्याची धडपड चालूच असते. मोफत दंत शिबिर, नेत्रशिबिर, रक्तदान शिबिर, रोगनिदान शिबिर, १० रुपयात चष्मे इत्यादी पण त्यात फार मोठे सातत्य राहत नाही. सोयीनुसार गाजावाजा करीत शिबिर पार पडतात. पेशंटला समाधान मिळते. तेवढ्यापुरते, फॉलोअप उपचाराचे घोंगडे भिजत राहते. शेवटी आदिवासींना भगत जवळचा वाटतो.

विचित्र मानसिकता आणि अंधश्रध्दा :
 आदिवासींची मानसिकता विचित्र आहे. अजूनही ठाणे जिल्ह्यातील खेड्यापाड्यात अंधश्रध्दा आणि या विचित्र मानसिकतेचा प्रत्यय येतो. गंडेदोरे, भगत, कोंबडे, बकरे सारेकरुनच मग 'लास्ट स्टेज' ला पेशंट दवाखान्यात आणण्याची त्यांची प्रथा आहे. खूप सांगून आणि प्रबोधन करुनही त्यात म्हणावा असा फार फरक पडत नाही. त्यांना नाडणारे ही तेथे असतातच. तुम्ही मला ५० रुपये द्या मी कोंबडं उतरवतो आणि अंगठीपण वाहतो. असं म्हणून काहीच न करता सोनार अंगठीचे आणि कोंबडीचे पैसे उकळून भगताला नैवेद्य दाखवतात. असेही याच ठाणे जिल्ह्यात ऐकायला मिळते की अजूनही डोळ्यातील मोती बिंदु बाभळीच्या काट्याने काढणारे महाभाग आहेत. एकीकडे डॉक्टरला दाखवायचे आणि दुसरीकडे गावठी भगताचे दारू, कोंबडे नैवेद्य चालूच असतात. आदिवासी जवळ वनौषधी चांगली आहे. त्यातला माहितगार माणूसही समंजस असतो, पण त्या एका निष्णात चांगल्या वैद्याचे रुपांतर भगतात होते.

 विचित्र मानसिकतेबाबत सांगायचे तर एकदा डॉक्टर म्हणाले आज जेवायची इच्छा होत नाही. मी विचारले कारण काय ? तर आज असा विचित्र पोस्ट मार्टम

२४