पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चप्पल आणि डोक्यावर किंचीत तिरकी पांढरी टोपी. अशी मध्यम उंचीची गुरुजींची मूर्ती होती. सहस्र दर्शन झाल्यावर म्हणजे ८० वय उलटूनही गुरुजींचे दात मजबूत होते. चावण्याची तक्रार नव्हती. कानाने कमी ऐकू येत नव्हते. आहाराच्या तक्रारी नव्हत्या. नजर नॉर्मल होती. दिसण्याची, डोळ्यांची तक्रार नव्हती. न थकता तरुणांनाही लाजवेल असे त्यांचे चालणे होते. हे विस्ताराने येथे सांगण्याचे कारण प्रत्यक्षात हे सारे गुरुजींच्या सहवासात प्रत्येकाला अनुभवायला मिळाले. गुरुजींची कार्यक्षमता, बुध्दीची चमक शेवटपर्यंत टिकली.

अखिल भारतीय वनवासी कार्यकर्ता सम्मेलने:

 रायपूर, कानपूर आणि गतवर्षीचे वाराणसी येथे साजरा झालेल्या अशा तिन्ही अखिल भारतीय पातळीवरील कार्यकर्त्यांच्या संमेलनात महाराष्ट्र प्रांताचे वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष या नात्याने गुरुजी वयाची ८० वर्षे पूर्ण होऊनही उपस्थित होते. त्यानिमित्ताने तिन्ही वेळा. २० - ३० तासांचा रेल्वे प्रवास आम्ही गुरुजींसमवेत केला. त्यांना सांभाळून नेणे व परत आणणे ही जणू सोबतच्या प्रत्येकाला निदान मनातल्या मनात तरी जबाबदारी वाटत असली पाहिजे. पण हे तिन्ही संमेलनाच्या निमित्ताने केलेले प्रवास उलट गुरुजींच्या सोबत अत्यंत सुखावह झाले. माफक आहार, वाचन सतत चालू, इतरांनी विषयालातोंड फोडलेच तर त्यावर आपल्या अधिकारवाणीने गुरुजी बोलत. चर्चा करीत; आपली मत मांडीत. काही आठवले की मधूनच वही, डायरी काढून त्यातून वाचून दाखवीत किंवा त्यात टिपण नोंदी करीत असत.

त्यांची नोटबुक किंवा लिहलेली वही ते जीवापलिकडे कमालीची जपत असत.

एकदा त्यांनी वही माझ्याकडे वाचायला दिली आणि त्याचा त्यांना विसर पडला. तर त्यांनी लगेच माईकवरुन निवेदन करायला लावले. महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष आवारी गुरुजी यांची वही कोणाला सापडली तर ती कार्यालयात जमा करावी. त्यांना माझ्याकडे 'वही तुम्हीच दिली होती' हे कळल्यावर सापडल्याचा केवढा आनंद झाला होता. याचा अर्थ टायपिंग, झेरॉक्स, डी.टी.पी. या काहीच सुधारणा आणि साधने हाताशी नसतांना खेड्यापाड्यात राहून गुरुजींनी क्षणाक्षणाला वेळ. कारणी लावून सगळी वनसंपदा आणि वनविद्या टिपली होती. त्यांची दुसरी प्रतही