पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४


कार्यभाग साधण्याची त्याला अपेक्षा असते. अत एव एकाद्यानें मित्रत्वाचा केवळ आव घातला तर त्याला मित्र मानूं नका, किंवा सबळ पुराव्याशिवाय एकाद्यास शत्रु असेंही समजूं नका.

 आह्मी बुद्धिमान व विवेकी प्राणी आहोंत अशी आह्मांस आढयता आहे. पण मनुष्यें नेहमींच विचारशक्तीच्या अनुरोधानें वागतात असें मानणे चुकीचें होईल. मनुष्य हा चमत्कारिक व विसंगत वर्तनाचा प्राणी आहे. त्याच्या वर्तनांत मेळ नसतो. मनोविकारांच्या किंवा पक्षपातांच्या आधीन होऊन मनुष्य पुष्कळ वेळां वर्तन करितो. ह्याचा परिणाम असा होतो कीं, माणसांचे मनोविकार जागृत करून त्यांना आपलेसे करून घेतां येतें, पण त्यांच्या विचारशक्तीची खात्री करून त्यांना आपलेसे करून घेतां येत नाहीं. हें व्यक्तिमात्रापेक्षां समाजास जास्त लागून आहे.

 वादविवाद करणें हें नेहमीं धोक्याचें काम असतें. त्यापासून गैरसमज किंवा स्नेहामध्यें वितुष्ट वारंवार येतें. वादविवादांत तुमचा मुद्दा खरा ठरेल, पण त्यामुळे तुमचा मित्र तुटेल. मित्र तुटून मुद्दा खरा होणें ही साधारणपणे चांगली अदलाबदल नव्हे. वादविवाद करणेंच असेल, तर प्रतिपक्षाचें जितकें तुह्मां कबूल करितां येईल तितकें कबूल करा. मुद्दे सुटले असतील ते दाखविण्याचा यत्न करा. वादविवादांत आपली हार केव्हां झाली हें थोड्यांनाच कळतें, व कळलें तर तें त्यांना खपत नाहीं. आणखी हरलों असें त्यांना कळलें, तरी आपलें मत चुकीचें आहे अशी त्यांची खात्री होत नाहीं. वादविवादानें एकाद्याची खात्री करण्याचा यत्न करणें कुचकामाचें आहे, हें ह्मणणें खरोखर फारसें अतिशयोक्तीचें होईल असें नाहीं. आपलें ह्मणणें स्पष्टपणें व थोडक्यांत सांगावें, व त्यामुळे प्रतिपक्षाला स्वतःच्या मताबद्दल संशय