पान:आपले आभाळ पेलताना.pdf/६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहिलं तर कुणाची टाप आहे तरास देण्याची ?" निर्मला शांतपणे सांगत होती.

 हितं राहिलं की मम्मी सारखी बडबडते की आयतं मिळतं खायला पण तुम्हाला चव नाही. हितं रहाणं म्हणजे दिल्या अन्नावर जगणं. मला आता सही करता येते. थोडं वाचताबी येतं. शिवणबी शिकलेय मी. बघू तर खरी सोवतंत्र राहून. म्हाईतर येऊच की हितं " हंसा बोलली.

 हे बोलणे मलाही खूप काही शिकवून गेले. विचार करायला लावून मेले. मम्मी जुन्या काळातल्या. त्या सर्वावर अपार माया करतात. पण बोलण्यात थोडाफार शिव्यांचा शिडकावा असतो. त्यांनाही समजावून सांगावे लागले की दिलासा घरातील महिलांना संस्थेकरवी दिले जाणारे सहाय्य म्हणजे उपकार वा दान नव्हे. सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, संस्थेत कार्यकर्त्या म्हणून आलेल्या महिला आणि दिलासा घरातील महिला सगळ्याच एकत्र राहातात. सर्वांसाठी सारख्याच सोयी असतात. पण इतकी मंडळी एकत्र राहायची म्हणजे नियम, त्यांचे पालन आदींवर भर द्यावाच लागतो. वसतिगृहातील मुली आणि कार्यकत्यांना या शिस्तीची गरज माहीत असते. पण घरगुती ... तेही जाचक अशा वातावरणातून आलेल्या दिलासा घरातील महिलांना या शिस्तीची कधी कधी अडचण वाटे. भुलाबाईतले एक गाणे आहे. त्यात मुली म्हणतात.

सासरीच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरीच्या वाटे गुलाल बुक्का दाटे ...


 दिलासातील लेकींना दिलासा घरातही "कुचूकुचू काटे " टोचायला नकोत याची काळजी घेण्याची सजगता निमूच्या निमित्ताने आम्ही शिकलो. आणि म्हणूनच तिच्यापेक्षा वयाने सात आठ वर्षांनी लहान पण मनाचे सूर ज्याने ओळखले आहेत अशा बाबूबरोबर सुखाने संसार करणाऱ्या निमूचे गुलाल बुक्क्यानी दाटलेले माहेरपण करायला 'दिलासा घर' उत्सूक आहे.

आपले आभाळ पेलताला/५८