पान:आपले आभाळ पेलताना.pdf/५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहून ९ ऑक्टोबर १९७८ रोजी तिच्या वडिलांना 'निर्मला मरण पावली' अशी तार केली. तात्काळ आई-वडील रडतभेकत औशाला आले तर तिथे निर्मला समोर दिसली. कारण विचारताच मुलीची नांदणूक व्हायची असेल तर मोटारसायकल द्या अशी मागणी केली. निर्मलाच्या वडिलांनी नाइलाजाने ४ एकर जमीन विकली आणि जावयाला ४००० रु. दिले. उरलेले पांच हजार रुपये लवकर देतो असा हवाला दिला. परंतु ते वेळेवर देणे जमले नाही. मारहाण, शिवीगाळ यांच्या वर्षावात निर्मला मुकाट्याने आला दिवस पार करीत होती. दोन वर्ष निघून गेली. निर्मलाच्या नवऱ्याने जवळच्याच खेड्यातील मुलीशी दुसरा विवाह केला. नवी नवरी निर्मलाच्या सासूची लांबची भाची म्हणून घरात आली.

 निर्मलाला ताकीद दिली गेली की, सवतीची ओळख मावसनणंद म्हणून करुन द्यायची. जर तिने खरी गोष्ट सर्वांसमोर आणली तर तिचे तुकडे करून टाकले जातील असा सज्जड धाकही घातला. दरम्यान निर्मलाचे सासरे पोलीस नोकरीतून सेवानिवृत्त झाले व त्यांनी आपल्या मुलास सुधाकरास पोलिस खात्यात नोकरी द्यावी यासाठी खटपट केली. त्यास यश आले आणि सुधाकरची पोलिस प्रशिक्षणासाठी निवड झाली.

 निर्मलाव्यतिरिक्त सारे घर सुखात होते. मुलाची पोलीस भरतीत निवड झाली. त्याला दुसरी बायकोही मिळाली. आता निर्मलेची अडचण मात्र सर्वांना जाचू लागली. तिचा खंगलेला चेहरा, खाली पाहून निमूटपणे काम करत राहाण्याची वृत्ती, सतत रडणारे डोळे पाहून सासऱ्याला वाटले की हिला पहाटे मारहाण करून हाकलून दिले तर ती एखादी विहीर गाठील नि प्रश्न सुटेल. पण झाले वेगळेच. सासरा, नवरा ... सासू यांनी तिला मारहाण करून पहाटेच्या अंधारात बाहेर काढले. जीव देणे अवघडच असते. जीवाची आशा कोणाला नसते ? निर्मला पाय ओढीत वडिलांच्या मित्राच्या जावयाकडे बहिणीच्या मैत्रिणीकडे गेली. तो औशातच राही. तिची दशा पाहून मित्राची मुलगी व जावई द्रवले. तो दिवस तिने त्यांच्या घरीच काढला. जावयाने तात्काळ सासऱ्यांना व निर्मलाच्या वडिलांना बोलावून घेतले. त्याच काळात जिल्ह्याला अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस प्रमुख लाभले होते. त्यांच्या कानावर ही गोष्ट निर्मलाच्या वडिलांनी घातली. त्यांनी प्रकरणाची शहानिशा करून सुधाकरची प्रशिक्षणासाठी झालेली निवड रद्द केली. सुधाकरला तात्काळ घरी पाठवले.

आपले आभाळ पेलताना/४८