पान:आपले आभाळ पेलताना.pdf/४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कहाणी निर्मलाची


 निर्मला मातोळेबद्दलच्या बातम्या अधूनमधून कानावर येत असतात. ती पुण्याला अमूक कंपनीत काम करते. पगार बरा मिळतो, चुलत भावाच्या घरी राहाते इत्यादी. एक दिवस अचानक त्या कंपनीत तयार होणाऱ्या पदार्थांचे पॅकबंद पुडे घरी आले. सोबत वार्ताही आली की निर्मला संस्थेच्या दिलासा घरात येऊन गेली. कंपनीत तयार होणाऱ्या गुलाबजामून, जिलबी, इडली, इत्यादी पदार्थाच्या पावडरीचे पुडे तिने आणले होते. स्वत: गुलाबजाम तयार करुन दिलासा घरातील सर्वांना खाऊही घातले. आणि एकेक पुडा भाभीसाठी.. म्हणजे माझ्यासाठी फारफार आग्रहाने पाठवला. मी प्रश्न केला.. "निर्मलेला घरी का आणलं नाही? नाहीतर मी आले असते भेटायला. निदान कळवायचं तरी."

 बाई तुमच्यासमोर यायला संकोच वाटतो पोरीला. शिवाय रात्रीच्या बसनी पुण्याला जायचं होतं. ड्यूटीला हजर राहायचं होतं. गंगामावशीनी.. मानवलोकच्या मम्मीने सांगितले. ही मम्मी म्हणजे गंगामावशी पवार. मम्मी आणि निर्मला यांचे नाते सख्ख्या मायलेकींपेक्षा जवळचे होते. एक दिवस मम्मीच्या तोंडूनच कळले की संस्थेच्या बालसदनमध्ये वाढलेला, थोराड बांध्याचा अनाथ मुलगा बाबू आणि निर्मला पुण्याला एकत्र राहातात. हे सांगताना मम्मींची मान खाली गेलेली. आवाज काहीसा कापरा झालेला. "काय करावं बाई ? आपलंच मीठ आळणी. या पोरींसाठी काय कमी उस्तवाऱ्या केल्या ? लातूरला काय कमी खेपा झाल्या ? आणि बब्याला तर लहानाचं मोठं केलं. दहावीपसवर ढकलीत आगलं. आन बघा काय वाढून ठिवलं त्यांनी आपल्या ताटात ? बाबूपरीस ही पोरगी सात आठ वरसांनी वडील असंल. तरी देखील असं वागावं तिनं ? हितंसुद्धा बाबूला जेवण वाढाया लगीबगी उठायची. त्याच्यासाठी चांगलंचुंगलं बाजूला काढून ठेवायची. मला वाटायचं की वडील भैनीप्रमाणे करतेय. पण झालं वेगळंच ... ताई नसिबाचे भोग बरे म्हणायचे, एवढा या शरीराचा भोग.. रोग तरास देतो. त्यानंच असं काहीबाही घडतं." मम्मी सांगत होती.

 निर्मला पुण्याला जाऊनही सहासात वर्ष होऊन गेली आहेत. गेल्या दहा अकरा वर्षात सुमारे पावणेदोनशे निराधार , एकाकी, गरजू स्त्रिया दिलासाघरात राहून गेल्या. त्यांच्या कहाण्या, तिथेच आणि त्यांच्यातीलच

आपले आभाळ पेलताना/४४