पान:आपले आभाळ पेलताना.pdf/४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टाकले. राहीबाई खूप कष्टाळू. नवऱ्याला सतराशे रुपये पगार असला तरी तो सारा दारुतच जाई. दोन मुलं मुकी. दोन वेळेला हातातोंडाची गाठ पडण्याची मारामार असे. शांतूने मुलांना शाळेत घालायला लावले. मुक्या मुलाचे नाव मूकबधिर विद्यालयात घालायला लावले. मुकी भाची शिवण शिकायलाही येत असे. बालसदनच्या मुलांची माया करतांना ती त्यातच रमत असे... एक दिवस आमच्याकडे लोणावळ्याहून पत्र आले की तेथील बालग्राममध्ये माता हवी आहे. शांतू जाण्यास उत्सुक होती. पण ना लिहिता येतं की वाचता येतं. मग हिशेब कशी लिहिणार ? तरीही आम्ही तिचे नाव पाठवले आणि तिची निवडही झाली. जाण्यापूर्वी तिच्या नवऱ्याविरुद्ध केलेली केसही जिंकली. पण शेवटी तिलाच त्याची कीव आली. त्याने शांतूला भरपाई म्हाणून अवघे पाच हजार रुपये दिले. कायदेशीररीत्या शांतू वेगळी झाली. तिचे म्हागाणे असे, "त्या गाडवाने तिलाबी फशीवलचं की. मी तिला कसा दोस देऊ? तिचं लगीन तिच्या भावानं लावलं. मला न का मिळेना सौंसार कराया. तिने तरी लगनाची बायकू म्हणून राहावं. तुमीच सांगितलं न्हवं? की पयल्या लगनाची बाईच खरी बायकू असते. दुसरीला ठिवलेली म्हनतात. भलेही द्येवासमूर हार घातले असतील. मी सोडचिठ्ठी मान्य केली तर तिचं लगीन खरं मानतील नव्हं? मी मायबाप नसलेल्यांचा सौंसार करेल. मायबापाविना वाढनाऱ्या लेकरांची माय होयाला आवडल मला."

 शांतू लोणावळ्याच्या आंतरभारती बालग्राममध्ये खूप चांगल्या रीतीने राहिली. गेल्या दोन तीन वर्षापूर्वी त्यातील एकाने बालग्राम भाज्याला सुरू केले आहे. त्या बालग्राममध्ये शांतू केवळ 'बालसदनमाता' म्हणून काम करीत नाही तर त्या संस्थेच्या कार्यकारिणीची ती सन्माननीय सदस्या आहे. तीन वर्षापूर्वी आदर्श सदनमातेचा पुरस्कारही तिला मिळाला आहे.

 राहीबाईचा दारुडा नवरा आता या जगात नाही. राहीच्या मूकबधिर मुलाला पनवेलच्या मूकबधिर विद्यालयात घालण्याचे काम शांतूने केले. उरलेल्या मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी घेतली. शांतू दिलासात आली, त्याला दहा वर्षे झाली आहेत. शांतू एकटीचं उगवाईच्या दिशेने प्रवास करीत नाही तर अनेकांपर्यन्त ही उगवती दिशा तिने पोहोचवली आहे. या दहा वर्षात शांतूचे जग बदलले आहे. कालपर्यंत ती जगासाठी होती. आज जग तिचे आहे. आभाळ तिच्यासाठी आहे.


आपले आभाळ पेगताना/४३