पान:आपले आभाळ पेलताना.pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माहितीच विचारायची नाही असे ठरवून तिला दिलासात दाखल करुन घेतले. दिलासा घराचे नियम पाळण्याचे हमीपत्र लिहून घेतले आणि दोन दिवसात मीरा दिलासाच्या वातावराणात मिसळून गेली. दिलासाच्या नियमानुसार तिची वैद्यकीय तपासणी केली. अवघ्या पंधरा वर्षाची कळी पण फुंकर घालून अकाली उमलवली गेली होती.

 मीराचे वडील मजुरी करीत. लातूरच्या तेल कारखान्यात ते कामावर होते. माणूस गरीब, प्रामाणिक आणि इमानादार. त्यामुळे मालकाच्या अगदी विश्वासातला. मालक काही वर्षापूर्वी आर्थिक कारणांमुले थेट आसाममध्ये निघून गेले होते. जाताना पैशाअडक्याबरोबर लक्ष्मण जाधवाच्या कुटुंबलाही घेऊन गेले. लक्ष्मणचा संसार मोठाच होता. सहा मुली नि दोघे नवरा बायको. गोहाटीला गेल्यावर दोन मुली आणि धाकटा मुलगा जन्मले. एकदाचा वंशाला दिवा मिळाला. अकराजणांच्या पोटाला भाकर घालण्याची ऐपत मालकातही नव्हती. बंगल्याच्या वळचणीत राहाण्यासाठी दोन खोल्या आणि महिना हजार रुपये लक्ष्मणच्या हातावर ठेवले जात. मुली आणि बायको आजूबाजूच्या घरात कामं करीत. मोठी शान्ता, नंतरची मीरा अकरा नि दहा वर्षाच्या. त्यांना घरकामासाठी दुसऱ्या कुटुंबातून ठेवले होते. मीरा रोज सकाळी सात वाजता सविता दीदीकडे कामाला जाई. तिथेच नाश्ता, चहा, जेवण मिळे. दीदी शाळेत टीचर होत्या. बाबूजी कॉलेजात शिकवत. दिदीची चिमुकली करिश्मा सांभाळायचे काम मीरा करी. शिवाय मछली धुवून घ्यायची. नारळांचा छोल काढून द्यायचा. मिक्सर, फूड प्रोसेसर, वॉशिंग मशीन, फोन इत्यादी आधुनिक उपकरणे सराईतपणे हाताळण्याची तिला सवय होती. मीराला गाण्याची खूप आवड. सविता दिदी रविन्द्र संगीत गाणारी. तिची गाणी ऐकून मीराही खूप गाणी शिकली होती. ती संस्थेत असतानाची गोष्ट मी एक दिवस "ओ सजना बरखाॅं बहार आयी" हे गीत गुणगुणत होते. लगेच मीराने मला मूळ बंगाली गाणे गाऊन दाखवले. मीरा त्या घरीच लिहायवाचायला शिकली. चार माणसांत कसे वागायचे, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत कसे करायचे, फोनवरचे निरोप घेऊन व्यवस्थित कसे सांगायचे यात मीरा तरबेज झाली होती. सविता दीदीही तिच्यावर खूप माया करीत. कपडेलते चांगले घेत. लाड करीत. जाणू ती त्यांच्या घरातीलच.

 पाहाता पाहाता चार वर्षे निघून गेली. आणि अचानक मालकाची

आपले आभाळ पेलताना/३०