पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असते. पूजा विधी वेगवेगळा असला, तरी धरणीमातेची करुणा भाकण्याचा व तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाव एकच असतो. भारतीय संस्कृती म्हणून ओळखल्या जाणा-या भाषा, धर्म, विचार, प्रथा सर्वांमध्ये आपणास कृतज्ञता, विनम्रता, दया इत्यादी गुण सामावलेले असतात. हे सर्व गुण घरगुती व सांस्कृतिक सण-समारंभाच्या निमित्ताने संस्काराच्या रूपाने नव्या पिढीस दिले जात असतात. या सर्वांमागे सांस्कृतिक ठेव्याच्या जपणुकीचा ध्यास असतो.
 भारतीय संस्कृतीतील या सद्भावांमुळेच आपण स्वत:ला अमुक जाती, धर्म वा राज्याचा न मानता भारतीय मानत असतो. या भारतीयत्वामुळेच आपल्यात राष्ट्रीय एकात्म भाव आणि सांप्रदायिक सद्भाव टिकून राहिला आहे. आज देशात ठिकठिकाणी होणारे दंगे, अत्याचार, हत्या यामुळे या सांस्कृतिक ठेव्यास जबर धक्का बसणार की काय अशी शंकास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे. देश ज्या अडचणीच्या स्थितीतून आज मार्गक्रमण करीत आहे ते पाहता आपली सांस्कृतिक घडण अधिक जाणीवपूर्वक करण्याची गरज निर्माण झाली आहे. सण आणि उत्सवांचा वापर या दृष्टीने आज व्हायला हवा.
 देशाचे हे सारे चित्र पाहिले की लो. टिळकांनी सार्वजनिक उत्सव का सुरू केले याचे कोडे उमजायला लागते. माणूस सार्वजनिक जीवनात वावरायला लागला की त्याची आत्मकेंद्रितता हळूहळू लोप पावू लागते. सार्वजनिक जीवनात पारंपरिकता किती थोतांड आहे याची जाणीव होऊ लागते. सार्वजनिक कार्याचा जर सर्वांत मोठा भाग कोणता असेल तर दुसन्यासाठी जगण्यास ते आपणास शिकवत असते. समृद्धी आली की मनुष्य आत्मरत होतो. परोपकाराय जीवनम्' चा ध्येयवाद अशा लोकांच्या गळी कधी उतरतच नाही आणि म्हणून परस्पर वैर, परस्पर अविश्वास सार्वजनिकरित्या व सर्वधर्मीय बांधवांना घेऊन ते साजरे केले पाहिजे.

 दैनंदिन जीवन आणि सण समारंभात एक मूलभूत फरक असतो तो हा की या दिवशी मनुष्य दिनक्रम सोडून अथवा परिपाठापक्षा वेगळ्या वातावरणात जात असतो. हे वातावरण परिवर्तन व नव्या गोष्टीचा स्वीकार यास अनुकूल असते. अनेक नवे संकल्प आपण सोडतो ते सणावारादिवशीच. मांगल्याचा शुभारंभ ही परिवर्तनाची नांदी असते. मानवी जीवनातील विकासात म्हणूनच सणांचे आगळे स्थान व महत्त्व असते. सण म्हणजे माणूस जोडायचे व माणूसपण वृद्धिंगण करायचे मंगलपर्व असते.

आकाश संवाद/८६