पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाल गुन्हेगारी : एक सामाजिक समस्या

 आपल्या समाजात अपराधाची वृत्ती प्राचीन काळापासून दिसून येते. माणसाची एक सवय म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. समाजशास्त्रीय मतानुसार गुन्ह्याचा आणि वयाचा काहीही संबंध नसतो. गुन्हा मोठी माणसेच करतात असं नाही. मुलेसुद्धा अपराधी असू शकतात आणि असतातसुद्धा. पण मुलांना अपराधी मानण्याचे आमचे विचार आता काळाच्या ओघात मागे पडले आहेत. एकविसाव्या शतकात आपल्या सामाजिक जीवनात खूप बदल होत असल्याचे आपण पहातच आहात. त्यांचा आपण जवळून अनुभवसुद्धा घेतला आहे. या बदलामुळेच आपले सर्व ज्ञान, विज्ञान विकसित झाले आहे. समाजशास्त्र, मनोविज्ञान, अपराध विज्ञान, आचरण विज्ञानासारखी अनेक शास्त्र गतिमान झाली आहेत. यांच्या नवीन विचारसरणीनुसार मुलांना गुन्हेगार मानणे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. वयाच्या सातव्या वर्षांपूर्वी मुले जी वर्तणूक करतात ती फक्त त्यांच्या अज्ञानामुळे. म्हणूनच आजकाल त्यांच्या बालसुलभ व्यवहारांकडे नवीन दृष्टिकोनातून पाहिले जाते. बाल अपराधाची सामाजिक समस्या आता समस्या राहिलेली नाही.

 आपण समाजात लहान मुलांना चोरी, दंगे, धोपे, काळा बाजार, काळे धंदे करताना जसे पाहतो तसेच त्यांना वाममार्गी झालेलेसुद्धा अनुभवतो. मुलांच्या हातून घडणा-या या वाईट गोष्टी म्हणजे वाईट संगतीचाच परिणाम असतो. कधी त्यांना मोठी माणसे आपल्या स्वार्थासाठी प्रोत्साहित करताना सुद्धा दिसतात. अशा सर्व वाममार्गी, उपेक्षित मुलांना सदाचारी बनवणारी एका कायदेशीर व्यवस्था आपण केली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या सुरुवातीच्या काळात ही व्यवस्था या मुलांपासून रक्षण करण्यासाठी निर्माण केली होती. आता काळ बदलला आहे. आज मुलांच्या कल्याणाची आणि न्यायाची चिंता या सर्वांमागे आहे.

आकाश संवाद/६३