पान:अर्धुक (Ardhuk).pdf/४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 नवऱ्याशी भांडायला ती गेली नाही कारण तो उलट्या काळजाचा आहे अशी तिची खात्री पटली होती. तिनं पुन्हा पै पै साठवून भांडीकुंडी घेतली. ती अशातशानं हार मानणारी नव्हती.
 सदाला तिचं बरं चाललेलं बघवत नव्हतं. ती भांडायला किंवा रडत भीक मागायला आपल्याकडे आली नाही हे त्याला खुपलं. तो तिच्या पाठीमागे तिच्या घरमालकिणीकडे गेला नि तिला म्हणाला, "ती वाईट चालीची बाई आहे. तिचे चाळे बिनबोभाट चालावे म्हणून तिला मी इथे रहायला नकोय. तुम्ही तिला खोलीत ठेवू नका. ती तुमचं नाव खराब करील."
 घरमालकिणीनं रुक्मिणीला सांगितलं, "बघ बाई,हे असं झालंय. मला माहीत आहे तू कशी आहेस. इतके दिवस तू इथे रहातेस, तुझ्याबद्दल वावगा शब्द कुणी काढलेला मी ऐकला नाही. पण तझा नवरा धमकी घालतोय मी पोलिसात जाईन म्हणून."
 "पोलिस काय करणारेत? तुमची खोली हाये. तुमी कुनाला बी भाड्यानं द्याल. त्यात पोलिसांचा काय संमंद?"
 "ते खरं ग, पण तुमच्या भांडणात मला काही पडायचं नाही. तू आपली दुसरीकडे रहायला जा."
 रुक्मिणी जिथे काम करायची त्या बाईंकडे गेली, म्हणाली, "मी कुटं जाऊ? आन जिथं जाईन तिथं पुना तो असं कशावरून करनार नाही?" तिला रडू कोसळलं.
 "तू रडू नको. चल मी तुझ्याबरोबर येते तुझ्या घरमालकिणीला भेटायला."
 रुक्मिणीच्या पाठीशी उभं रहाणारं कुणीतरी आहे हे पाहून ती बाई मवाळली. रुक्मिणीला तिथं राहू द्यायला तयार झाली.
 बरेच दिवस रुक्मिणीचं आयुष्य सरळरेषेत एकसुरी चाललं होतं. एक दिवस कामावरून घरी जाताना सदानं तिला अडवलं.
 "माजी वाट सोडा."
 "माझं ऐकून तरी घे."
 "मला काई बी आयकायचं नाई तुमचं. आजवरदी आयकून फसले त्येवडं पुरे."

 तो तिच्याबरोबर चालत राहिला. ती खालमानेनं झपाझपा पाय टाकीत

॥अर्धुक॥
॥४२॥