पान:अर्धुक (Ardhuk).pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुष्कळ ऐकून घेतलं तुझं. आता पुन्हा मी तुला न्यायला यायचा नाही." तिचं चित्त चलबिचल झालं. ती आईला म्हणाली, "जाऊ का मी त्यांच्याबरोबर?"
 "जातीस तर जा. आमचं काय म्हातारा-म्हातारीचं? आम्ही कसं बी निभावून नेऊ. जा तू."
 आईनं असं म्हटल्यावर तिचा पाय निघेना. लवकरच तिचा बाप मरून गेला. मग तर आईला एकटं सोडणं शक्यच नव्हतं. यमुनेचा नवरा सासूला आपल्या घरी नेऊन संभाळायला तयार होता, पण म्हातारीला आपलं गाव, घर सोडून परावलंबी आयुष्य पत्करायचं नव्हतं. शेवटी त्याने यमुनेचा नाद सोडून दुसरं लग्न केलं.
 हळूहळू रेखा मोठी झाली, चार इयत्ता शिकली. कामातही तिची मदत व्हायला लागली. म्हातारी थकली होती, ती घरी राहून घरचं बघायची. एकूण त्यांचं चांगलं चाललं होतं. फक्त मधनं मधनं यमुनेला वाटायचं, मी एक नवऱ्याला सोडून आईपाशी येऊन राहिले. पण माझी मुलगी कशावरून माझ्यापाशी राहील? मग आई गेल्यावर मला कुणाचा आधार?
 गोविंदा तिला धुण्याच्या घाटावर दिसायचा. एकदा रेखा मदतीला नव्हती तेव्हा जाड चादरी पिळायला त्यानं तिला मदत केली. त्यातनं त्यांची ओळख झाली. त्याला मूल नव्हतं. त्याची कजाग बायको साऱ्या परीट आळीला माहीत होती. एखाद्यानं टाकून दिली असती. हा सज्जन म्हणून संभाळायचा, पण त्याला संसारात कसल्या तऱ्हेचं सुख नव्हतं.
 तिची गोविंदाशी ओळख झाल्यापास्नं रेखा घाटावर येईनाशी झाली. आजीनं का ग म्हणून विचारलं तेव्हा ती म्हणाली, "ती त्या बाबाशी गुलुगुलु बोलत बसते. मला नाही आवडत." म्हातारीच्या कानावर कुणकुण आलीच होती. एक दिवस यमुनेचं कपड्यांचं गाठोडं पोचवायला तो तिच्याबरोबर आला तेव्हा म्हातारी खवळली.
 "त्याला इथं का आणलंस?"
 "काय बिघडलं आणलं म्हणून? माझं गठुळं लई जड होतं ते घेऊन आला तो."
 "तो चांगला माणूस नाही. लोकं त्याच्याबद्दल काहीबाही बोलतात."

 "लोकं काई बी बोलतील. तुला माहीताय का त्यानं कसलं वंगाळ काम केलं म्हणून?"

॥अर्धुक॥
॥३३॥